स्वच्छता करण्याकडे कॅन्टोन्मेंट प्रशासनाचे दुर्लक्ष
बेळगाव : मध्यवर्ती बसस्थानकाच्या विकासासाठी आणि सुशोभिकरणासाठी कोटीचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र या परिसरातील स्वच्छतेकडे कॅन्टोन्मेंट प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. मध्यवर्ती आणि शहर बसस्थानकाच्या समोर कचऱ्याचे ढिगारे साचले असून, गेल्या चार दिवसांपासून कचऱ्याची उचल करण्यात आली नाही. परिणामी या परिसरात दुर्गंधी पसरल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. मध्यवर्ती बसस्थानकात दररोज शेकडो बसची रेलचेल असते. त्यामुळे हजारो नागरिक ये-जा करीत असतात. पण या परिसरात अस्वच्छता निर्माण झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. स्मार्ट सिटी बनविण्यासाठी प्रशासनाने आटापिटा चालविला असून, बसस्थानकाच्या विकासासाठी आणि सुशोभिकरणासाठी कोटीचा निधी खर्च करण्यात आला आहे. पण परिसरात अस्वच्छता निर्माण झाल्याने खर्ची घातलेला निधी वाया गेल्याचे दिसून येत आहे. बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे ढिगारे साचल्याने प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. हा परिसर कॅन्टोन्मेंट हद्दीत येत असल्याने स्वच्छतेची जबाबदारी कॅन्टोन्मेंटकडे आहे. पण कॅन्टोन्मेंटकडून वेळेवर स्वच्छता केली जात नाही. स्वच्छतेच्या कामाकडे कानाडोळा केला आहे. शहरातील नागरिक बसस्थानकावर येत असल्याने परिसराची स्वच्छता कॅन्टोन्मेंटने का करावी, असा मुद्दा उपस्थित करून कचऱ्याची उचल करण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. जिल्हा प्रशासनाने तसेच कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन कचऱ्याची उचल वेळेवर करावी, अशी मागणी होत आहे.