वार्ताहर /उसगांव
24 कुंडिय नवचेतना जागरण गायत्री महायज्ञ, विराट दीपयज्ञ व संगीतमय पावन प्रज्ञापुराण कथा सोहळा 22 ते 25 फेब्रु. दरम्यान साईनगर तिस्क उसगांव येथील श्री साईमंदिर परिसरात साजरा करण्यात येणार आहे. आयोजकांतर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यावेळी विनय केशजी, लक्ष्मण जोशी, भारत नाईक, नरेश बाळवे, रमाकांत कुट्टीकर, जयदत्त गाड, शशिकांत चिपकर, बाला च्यारी, संजय गाड व उल्हास सतरकर हे उपस्थित होते. संपूर्ण विश्वात भारतीय संस्कृतीची चेतना, जीवनसाधनेच्या माध्यमातून जागृत करण्याच्या हेतूने युगतीर्थ शांतीकुंज हरिद्वारच्या प्रेरणेने नारी सशक्तीकरण अंतर्गत व अखिल विश्व गायत्री परिवार शांतीकुंज हरिद्वार तत्वावधानाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्तीसोबतच भ्रष्टाचार, अनाचार, आतंकवाद, अनास्था, निराशा व तणाव यासारख्या मनुष्याच्या दुश्चिंतन व दुष्कर्माने उत्पन्न झालेल्या विभिन्न समस्यांचे निवारण करण्यासाठी विज्ञान जेथे असमर्थ ठरते तिथे अध्यात्म हा रामबाण उपाय आहे. युगतीर्थ शांतीकुंज हरिद्वारहून आलेल्या वेदविज्ञ, यज्ञाचार्य विनय केशजी, हरि शंकरजी, तपेश्वरजी, बळीरामजी व सुनील सिंगजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होणार आहे. बुधवार 22 रोजी दुपारी 3 वा. कलशयात्रा, गुरुवार 23 रोजी सकाळी 9 ते दुपारी 12.30 वा. यावेळेत 24 कुंडिय गायत्री महायज्ञ आणि विभिन्न संस्कार दुपारी महाप्रसाद, शुक्रवार 24 रोजी धार्मिक विधी व दुपारी महाप्रसाद होईल. शनिवार 25 रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 वा. यावेळेत 24 कुंडिय गायत्री महायज्ञ विभिन्न संस्कार पूर्णाहुती, विदाई, कार्यकर्त्यांचा सन्मान व महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होणार आहे.