काँगेस अध्यक्षपद निवडणूक स्पर्धेला आणखी एक वळण : उमेदवारीसाठी आज अखेरचा दिवस
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून आपण बाहेर पडत आहोत, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी घोषित केले आहे. त्याचबरोबर, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि गांधी परिवाराच्या निकटचे समजले जाणारे दिग्विजय सिंग यांनी आपण निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अंतिमतः स्पर्धेत शशी थरुर आणि दिग्विजय सिंग राहणे शक्य आहे.
काँगेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रतिदिन नवनव्या नाटय़मय घडामोडी घडत आहेत. बुधवारपर्यंतचे वातावरण अशोक गेहलोतच पक्षाध्यक्ष होणार असे होते. प्रश्न केवळ राजस्थानचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार हा होता आणि त्यावरच अधिक चर्चा होत होती. तथापि गुरुवारी अचानक गेहलोत यांनीच निवडणुकीतून माघार घेण्याचे ठरविल्याने परिस्थिती पुन्हा बदलली आहे.
सोनिया गांधींकडे क्षमायाचना
आपण अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यानंतर राजस्थानातील काँगेसमध्ये जो गोंधळ उडाला आणि शिस्तभंगाचे प्रकार घडले त्यासंदर्भात गेहलोत यांनी सोनिया गांधींकडे क्षमायाचना केली आहे. राजस्थानातील गैरशिस्तीमुळे आपण अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाहेर पडत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपण आतापर्यंत राजस्थानचे तीनवेळा मुख्यमंत्री बनलो असून पक्षाचे शिस्तबद्ध सैनिक असल्याचेही त्यांनी आपल्या वक्तव्यात स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्रीपदी राहणार का
पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाहेर गेल्यानंतर आता राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी आपणच कायम रहाल का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर आपण गेली 50 वर्षे पक्षाचे काम केले आहे. अत्यंत शिस्तबद्ध आणि पक्षाचे नियम पाळणार कार्यकर्ता म्हणून आपली ओळख आहे. त्यामुळे या संदर्भात आपण पक्ष जे सांगेल त्याप्रमाणे करण्यास तयार आहोत. याबद्दल कोणाच्याही मनात शंका नको, असेही गेहलोत यांनी स्पष्ट केले.
सूत्रे गांधी परिवाराकडेच, आम्ही केवळ नाममात्र
काँगेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी केलेल्या एका विधानामुळे मोठी खळबळ राजकीय वर्तुळात माजली आहे. पक्षाध्यक्ष कोणीही झाला तरी तो गांधी कुटुंबाशीच इमानदारी दाखविणार आहे. पक्षाची सूत्रे गांधी परिवाराजवळच राहणार असून आम्ही केवळ नाममात्र आहोत, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगून टाकले. त्यामुळे ही निवडणूक केवळ लोकांच्या डोळय़ात धूळफेक करण्यासाठीच आहे का, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचप्रमाणे अशोक गेहलोत पक्षाध्यक्ष झाले असते तर कदाचित ते गांधी कुटुंबाला डोईजड होण्याची शक्यता होती. कारण ते अनुभवी असून जनतेचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या हाती काँगेसची सूत्रे गेल्यास गांधी कुटुंबाच्या काँगेसवरील वर्चस्वासाठी तो धोका ठरण्याची शक्यता गृहित धरुन पक्षश्रेष्ठींनीच गेहलोत यांनी स्पर्धेतून बाहेर पडावे अशी व्यवस्था केली असा आरोपही होत आहे. काँगेस पक्ष गांधी कुटुंबाच्याच हाती अपरोक्षपणे राहील हे स्पष्ट करुन दिग्विजय सिंग यांनी एकदम काँगेसचा भांडाफोडच केला असेही बोलले जात आहे.
आज शेवटचा दिवस
काँगेस अध्यक्षपद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याचा आज शुक्रवार हा शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत एकही अर्ज सादर झालेला नाही. शेवटच्या दिवशी शशी थरुर अर्ज सादर करणार आहेत. तसेच दिग्विजय सिंगही शेवटच्या दिवसाचीच वाट पहात आहेत. आणखी कोणी इच्छुक आहे का, हे आज शुक्रवारी दुपारपर्यंत समजणार आहे. त्यानंतर खरी चुरस सुरु होणार आहे.
नाटय़मय घडामोडी
- काँगेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणीही ‘वजनदार’ नेता नाही
- गेहलोत बाहेर गेल्याने थरुर यांचे पारडे जड होण्याची मोठी शक्यता
- अध्यक्ष कोणीही झाला तरी गांधी कुटुंबियांकडेच सूत्रे राहणे शक्य