एका खिशातील पैसा दुसऱ्या खिशात टाकण्याचा प्रकार : वसुंधरा राजे यांचे टीकास्त्र
राजस्थान निवडणुकीच्या प्रचारात आता भाजपच्या वरिष्ठ नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे देखील सक्रीय झाल्या आहेत. वसुंधरा राजे यांनी काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केली आहे. अशोक गेहलोत यांचे सरकार मोफत योजना देत असल्याचे जनतेला वाटतेय. परंतु प्रत्यक्षात असे नाही. जनतेचा पैसा जनतेच्या एका खिश्यातून काढून घेत दुसऱ्या खिशात टाकला जात आहे. मग मोफत सुविधा देण्याचे ढोंग केले जात आहे. काँग्रेसचा मतदारांना फसविण्याचा हा एक फंडा असल्याची टीका वसुंधरा राजे यांनी केली आहे.
काँग्रेस सरकार लोकांना मोफत योजनांचे प्रलोभन दाखवून स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे. परंतु प्रत्यक्षात चित्र याच्या उलट आहे. काँग्रेस जनतेला काहीच मोफत देत नाही. उलट जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत तिच्या एका खिशातून पैसे काढून घेत दुसऱ्या खिशात टाकला जात आहे आणि सरकार मोफत वीज देत असल्याचे सांगत आहे, असे वसुंधरा यांनी म्हटले आहे.
भोळ्याभाबड्या जनतेला मूर्ख केले जात आहे. वीज बिल माफ करण्याचे ढोंग करत दुसरीकडे अधिभार लादून ही रक्कम जनतेकडूनच वसूल करण्यात येत आहे. काँग्रेसने अधिभार वाढवून लोकांच्या एका खिशातून पैसे काढून घेत मोफत वीजेच्या नावावर तो पैसा दुसऱ्या खिशात टाकला आहे. यात काँग्रेस सरकारने काहीच दिलेले नाही, जे काही मिळाले ते लोकांच्या पैशांतूनच असा दावा राजे यांनी केला आहे.
राजस्थानात आता वीजपुरवठा व्यवस्था कोलमडली आहे. आमचे सरकार असताना ट्रान्सफॉर्मर बिघडल्यावर केवळ 72 तासात नवा ट्रान्सफॉर्मर मिळत होता. परंतु काँग्रेस सरकारच्या काळात तर 72 दिवसातही नवा ट्रान्सफॉर्मर मिळत नसल्याची स्थिती आहे. कारण सरकारकडे पैसाच नाही. पैसेच नसतील तर राज्य सरकार ट्रान्सफॉर्मर खरेदी कुठून करणार? विजेची गरज असली तरीही वीज खरेदी करू शकत नाहीत. गेहलोत केवळ मोफत योजनांची घोषणा करत आहेत. मोफत फोन घेऊन जा, मोफत खत न्या, मोफत वीज मिळवा अशा घोषणा करत आहेत, परंतु याकरता गेहलोत सरकारने जनतेला कसे लुटले हे कळल्यावर धक्काच बसेल असे वसुंधरा राजे यांनी म्हटले आहे.