जर्मन राजदूताचे स्पष्टीकरण
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काश्मीरसंबंधी आमची भूमिका बदललेली नाही आणि या जटिल मुद्दय़ावर तोडगा काढण्यासाठी ‘द्विपक्षीय पद्धत’च उपयुक्त ठरू शकते असे जर्मनीने रविवारी स्पष्ट केले आहे. काश्मीर मुद्दय़ावर तोडगा काढण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाला यात सामील करण्याचे जर्मनी आणि पाकिस्तानच्या विदेश मंत्र्यांचे मत भारताने काही दिवसांपूर्वी फेटाळून लावले हेते.
काश्मीर मुद्दय़ावर जर्मनीने कुठलेही नवे धोरण आणलेले नाही. जर्मनी या प्रकरणी स्वतःच्या जुन्या भूमिकेवर कायम असल्याचे जर्मनीचे राजदूत फिलिप एकरमॅन यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. जर्मन विदेशमंत्री एनालेना बाएरबोक आणि पाकिस्तानचे विदेशमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी 7 ऑक्टोबर रोजी बर्लिन येथील परिषदेत काश्मीर मुद्दय़ावर संयुक्त राष्ट्रसंघाकडून तोडगा काढला जावा असे विधान केले होते. याप्रकरणी भारताने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
जर्मनीच्या विदेश मंत्र्यांच्या वक्तव्यावरून प्रसारमाध्यमांमध्ये गोंधळ निर्माण झाला असल्याचा दावा एकरमॅन यांनी केला आहे. द्विपक्षीय चर्चा, द्विपक्षीय मार्गानेच काश्मीर प्रश्न सोडविला जाऊ शकतो असे जर्मनीच्या विदेश मंत्र्यांनी नमूद केले होते. आमचा देश या मुद्दय़ावर स्वतःच्या जुन्या भूमिकेवर ठाम असल्याचे जर्मनीच्या राजदूताने सांगितले आहे.