जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील यांचे युवकांना आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
आज-काल जगभरात विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण तसेच विविध सेवा आणि उत्पादन क्षेत्रामध्ये रोजगार उपलब्ध होत आहेत. तेव्हा तरुणांनी आपले कौशल्य विकसित करून निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करून उच्चपदे मिळवावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.नितेश पाटील यांनी केले.
कर्नाटक कौशल्य विकास महामंडळाच्यावतीने कौशल्य विकास, उद्योजकता, औद्योगिक प्रशिक्षण आणि रोजगार आयोगाच्यावतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. नेहरूनगर येथील मराठा मंडळाच्या कला व विज्ञान महाविद्यालयामध्ये रोजगार मेळाव्याचे उद्घाटन झाले. त्यावेळी त्यांनी तरुणांना हे आवाहन केले.
विद्यार्थीदशेनंतर आपले काम, पद यावरूनच आपणाला ओळखले जाते. नोकरी किंवा व्यवसाय करताना तुमची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी मेहनत करावी, त्या मेहनतीच्या जोरावर चांगले पद मिळवावे, असे त्यांनी सांगितले. मातृभाषेतून शिक्षण घेऊन अनेक जणांनी मोठ्या पदांवर आज झेप घेतली आहे. मात्र, त्यासाठी कठोर परिश्रमांची गरज असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील यांनी सांगितले.
आपल्या देशातच नोकरी किंवा व्यवसाय करण्यावर भर द्यावा. याबाबत उदाहरण देताना ते म्हणाले, मला परदेशात नोकरी मिळण्याची मोठी संधी होती. मात्र, मी देशातच राहून आज या पदापर्यंत पोहोचलो असल्याचे त्यांनी सांगितले. या मेळाव्यामध्ये 38 विविध कंपन्या सहभागी झाल्या होत्या. 3 हजार 500 इच्छुकांनी नोकरीसाठी नोंदणी यावेळी केली. कौशल्याच्या आधारे प्रत्येकाला नोकरी मिळू शकते, त्यासाठी प्रथम अनुभव घेणे महत्त्वाचे आहे. यामुळेच हा कौशल्य विकास मेळावा घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा ट्रेझरीचे सहसंचालक सुरेश हल्याळ, माहिती आणि जनसंपर्क विभागाचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी डॉ. बसवप्रभू हिरेमठ, मराठा मंडळ महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन बेन्नाळकर, प्रा. गुरुपादय्या हिरेमठ यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.