ग्रामस्थांचे नगरपंचायतीला मागणीचे निवेदन : बससेवा-गतिरोधकाची व्यवस्था करा
वार्ताहर /किणये
मच्छे गावात डुकरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गावात डुकरांचा वावर इतका वाढला आहे की, नागरिकांना घरातून बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. ही डुकरे शेतशिवारातील पिके फस्त करू लागली आहेत. थेट नागरिकांच्या घरी दरवाजापर्यंत येऊन ओरडू लागली आहेत. या डुकरांचा त्वरित बंदोबस्त करावा या मागणीचे निवेदन सोमवारी मच्छे नगरपंचायतीला ग्रामस्थांनी दिले. गावाला कायमस्वरुपी बससेवा सुरू करावी, गावच्या मुख्य रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात यावेत, अशीही मागणी नागरिकांनी केली.
गावचा विस्तार झपाटय़ाने वाढत आहे. मात्र, या गावातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. गावात गेल्या पाच-सहा वर्षांपासून डुकरांचा वावर वाढला आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कित्येक वेळा निवेदन देऊनही नगर पंचायतीने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे, अशा तक्रारी नागरिकांतून होत आहेत.
शिवारातील भात, भुईमूग, रताळी, बटाटा, ऊस व भाजीपाला डुकरे फस्त करू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱयांचे मोठे नुकसान होत आहे.
त्वरित बंदोबस्त करू-नोडल अधिकारी
डुकरे गल्लीमध्येही बिनधास्तपणे फिरत आहेत. काही वेळा ती महिला व बालकांवर थेट हल्ला करू लागली आहेत. त्यामुळे महिलांसह पालकवर्ग भयभीत झाला आहे. नगरपंचायतला यापूर्वीही निवेदन दिले आहे. पुन्हा सोमवारी ग्रामस्थांनी नोडल अधिकारी शिवानंद यांना निवेदन दिले. निवेदन स्वीकारल्यानंतर तीन दिवसात डुकरांचा बंदोबस्त करू, असे आश्वासन अधिकाऱयांनी दिले.
कायमस्वरुपी बससेवा सुरू करा
सध्या मच्छे गावाला एकही बस सुरू नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अन्य गावच्या बसनेच जावे लागत आहे. गावातील विद्यार्थी बेळगावला मोठय़ा संख्येने शाळेसाठी जात असतो. मात्र, बस नसल्याने तासन्तास बसस्थानकावर ताटकळत बसावे लागते. खानापूर व अन्य ठिकाणांहून येणाऱया बसेस मच्छे बसस्थानक येथे थांबत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थी व पालकवर्गातून होत आहेत. त्यामुळे गावची लोकसंख्या व विद्यार्थ्यांचा विचार करून गावासाठी कायमस्वरुपी बस सुरू करावी, अशी मागणीही निवेदनात केली आहे.
गतिरोधक बसविण्याची मागणी
बेळगाव-पणजी महामार्गावरील मच्छेनजीक अपघाताच्या घटना अधिक घडत आहेत. त्यामुळे मुख्य रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देताना सुरेश लाड, चांगाप्पा हावळ, संजय सुळगेकर, शंकर बेळगावकर, बसवंत नावगेकर, निंगाप्पा नावगेकर, नागेश गुंडोळकर, पिंटू बेळगावकर, बापू पुजारी, मारुती लाड, फकिरा नावलगेकर, महादेव मंगणाकर, असद हुजदार, मारुती लाड, पांडू लाड, अनिल कुमार, अनगोळकर, सचिन बेळगावकर, भोमाणी लाड, भुजंग लाड आदींसह नागरिक उपस्थित होते.