क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना टायमिंगला मोठे महत्त्व असते. ते योग्यरीतीने साधल्यास कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त धावा देणारा फटका फलंदाज मारू शकतो. टायमिंग किंवा अचूक वेळ साधण्याचे महत्त्व केवळ क्रिकेटमध्येच नव्हे तर सर्वच क्षेत्रात आहे. अगदी नशिबाचा लाभ उठविण्यासाठीसुद्धा ते उपयोग पडते, असे एका अनोख्या घटनेवरून दिसून आले आहे.
गुजरातमध्ये अहमदाबाद येथील एक बँक खातेदार रमेशभाई सगर यांच्या बँक खात्यामध्ये एक दिवस अचानक 11 हजार 677 कोटी रुपये जमा झाले. रमेशभाई हे सातत्याने शेअरबाजारात टेडिंग करतात. 26 जुलैला ते सकाळी 9.30 वाजता टेडिंग करत असताना आपल्या बँक खात्यात ही भलीमोठी रक्कम जमा झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. मात्र, ही रक्कम फार काळ खात्यात राहणार नाही, हे देखील त्यांनी ओळखले. त्यामुळे त्यांनी त्वरित यातील 2 कोटी रुपये शेअरबाजारात लावले. विशिष्ट समभागांमध्ये ते गुंतविल्याने अवघ्या अर्ध्या तासात त्यांना 5 लाख 64 हजार रुपयांचा नफा झाला.
तोपर्यंत बँकेच्या लक्षात आपली चूक आली होती आणि त्यांनी सगर यांच्या खात्यात चुकून घालण्यात आलेले पैसे पुन्हा काढून घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती. ही प्रक्रिया साधारण दोन तास चालली. सगर यांना याची कल्पना होतीच, त्यांनी अर्ध्या तासात 2 कोटी रुपये काढून पुन्हा आपल्या बँक खात्यात जमा केले होते. बँकेने सर्व 11 हजार 677 कोटी रुपयांची रक्कम परत घेतली. तशी डिजिटल एंट्रीही सगर यांच्या खात्यात करण्यात आली. पण तोपर्यंत त्यांनी साडेपाच लाख रुपयांहून अधिक रक्कम मिळविलेली होती. नियमानुसार बँकेला हा कमावलेला फायदा परत घेता येणार नव्हता. त्यामुळे सगर यांच्या डिमॅट खात्यात ही 5 लाख 64 हजारांची रक्कम राहिली.
याबद्दल बोलताना सगर यांनी टायमिंगचे महत्त्व विशद केले. रक्कम आपल्या खात्यात चुकून जमा झाल्याचे त्यांनी वेळीच लक्षात घेतले. ही रक्कम बँक परत घेणार, हे देखील त्यांनी वेळीच ओळखले. मधल्या काळात या रकमेचा लाभ कसा उठवता येईल, याची योजना त्वरित आखली आणि त्याप्रमाणे त्यातले 2 कोटी रुपये उपयोगात आणून 5.64 लाख रुपयांचा नफा कमावला. बँकेने नफा मागण्याचा अधिकार बँकेला नव्हता. कारण चूक बँकेची होती. हे सर्व योजना त्यांनी केवळ पाच मिनिटांमध्ये केली आणि त्यामुळे त्यांचा इतका मोठा लाभ झाला. यावरून टायमिंगचे महत्त्व लक्षात येते.