भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे महापालिकेसमोर आव्हान
प्रतिनिधी / बेळगाव
मोकाट कुत्री ही संपूर्ण बेळगावची समस्या आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, ही मागणी सातत्याने होत आहे. परंतु त्यांचा बंदोबस्त करताना प्रशासनालाच अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कुत्र्यांसह मोकाट जनावरे आवरा, अशी मागणी नागरिक करतात. प्राणीदया संघटना मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नका म्हणून आग्रह धरतात. त्यामुळे एकूणच भटक्या कुत्र्यांसह जनावरे पकडण्याच्या मोहिमेचे ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’ असेच काहीसे झाले आहे.
शहरात हॉटेल, मांस विक्रीच्या दुकानांची संख्या वाढली आहे. येथूनच टाकाऊ अन्न हे कुत्र्यांचे व जनावरांचे खाद्य बनत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी बहुसंख्य हॉटेलनजीक कुत्र्यांचा वावर वाढलेला असतो. त्यामुळे तेथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना कुत्र्यांची भीती वाटते. अनेकदा या कुत्र्यांनी नागरिकांवर हल्लेही केले आहेत.
अलीकडेच बापट गल्लीतील कुत्र्याने 11 जणांचा चावा घेतला आणि त्यानंतर पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आला. मनपा प्रशासनाला कुत्र्यांचा बंदोबस्त करावयाचा असला तरी त्यामध्ये अनेक अडचणी आहेत. अॅनिमल बर्थ कंट्रोलच्या नियमानुसार एखाद्या कुत्र्याला रेबिज झाला असेल किंवा ते आक्रमक झाले असेल तरच महानगरपालिकेला त्याला ठार करता येते.
मुख्य म्हणजे पूर्वी कुत्र्यांना मारण्यासाठीचे औषध केवळ 440 रुपयांना होते. आता सरकारने त्याची किंमत 40 हजार रुपये केली आहे. इतकी भरमसाट वाढ करण्याचे कारण म्हणजे शेतकरी जंगली प्राण्यांना मारण्यासाठी या औषधाचा वापर करू लागले आहेत. हे लक्षात येताच सरकारने या औषधाची किंमत वाढविली आहे. मुख्य म्हणजे जोपर्यंत सरकारी प्रिस्क्रिप्शन मिळत नाही तोपर्यंत हे औषध बाहेर दिले जात नाही. त्यामुळे आता औषध घेणे हे प्रशासनालाही परवडणारे नाही.
परिणामी कुत्र्यांची नसबंदी करणे हा एकच पर्याय मनपासमोर राहिला आहे. वास्तविक फक्त मादी कुत्रीची नसबंदी करण्याचे आदेश आहेत. परंतु कुत्र्यांचा वाढता उपद्रव पाहता नर आणि मादी कुत्री दोघांचीही नसबंदी करण्याची मोहीम राबविली जात आहे. मात्र प्राणीप्रेमी मंडळे भूतदयेपोटी रस्त्यांवरील कुत्र्यांना अन्न देतात. त्यामुळे त्या परिसरात कुत्र्यांची संख्या वाढत राहते. त्याचा फटका नागरिकांना बसतो.
आक्षेप घेतल्यास प्राणीदया संघटनेकडे तक्रार केली जाते. एकूणच भटकी कुत्री आणि मोकाट जनावरे यांच्याबाबत मनपा प्रशासनच कोंडीत सापडले आहे. याबाबत महानगरपालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. संजीव डुमगोळ यांची भेट घेतली असता हॉटेल आणि मांसविक्रीच्या दुकानांबाहेरील कचरा वेळेवर उचलला जात असल्याने कुत्र्यांचा उपद्रव कमी झाला आहे. शिवाय आता पुन्हा नसबंदी मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत 1400 कुत्र्यांची नसबंदी झाली आहे, असे त्यांनी सांगितले.