श्रीनगर / वृत्तसंस्था
काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद आज, 26 सप्टेंबर रोजी आपल्या नव्या पक्षाची घोषणा करू शकतात. रविवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपण सोमवारी नव्या पक्षाची घोषणा करणार असून मी तुम्हा सर्वांना आमंत्रित करत आहे, असे येथे आझाद यांनी सांगितले. नव्या पक्षाचे नाव आणि झेंडा निश्चित झाला असल्याचे त्यांनी सांगितले. आपला नवा पक्ष जम्मू-काश्मीरच्या राजकारणात नवा अध्याय लिहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. आझाद 25 आणि 26 सप्टेंबरला जम्मूमध्ये असतील आणि 27 ऑगस्टला श्रीनगरला भेट देतील. 28 ऑगस्ट रोजी ते दिल्लीला रवाना होतील.
नवीन पक्षाच्या स्थापनेपूर्वी आझाद यांनी रविवारी आपल्या समर्थकांसोबत वेगवेगळय़ा ठिकाणी बैठकांचे आयोजन केले होते. या बैठकांमध्ये त्यांच्या नव्या पक्षात सामील होणारे नेते आणि सहकारी यांचा समावेश होता. मुख्यत्वेकरून माजी उपमुख्यमंत्री ताराचंद, डॉ. मनोहर लाल शर्मा, जीएम सरोरी, अब्दुल मजीद वाणी, बलवान सिंग, गौरव चोप्रा, जुगल किशोर आदी स्थानिक नेते त्यांच्यासोबत बैठकीत सहभागी झाले होते.
आझाद यांच्या पक्षाचे प्राधान्य काय?
गुलाम नबी आझाद यांनी 26 ऑगस्ट रोजी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. त्यांच्यानंतर जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री ताराचंद यांच्यासह अनेक माजी मंत्री आणि आमदारांनी काँग्रेस सोडली. काँग्रेस सोडण्यासोबतच त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये नवा पक्ष काढण्याची घोषणा केली होती. जम्मू-काश्मीरमध्ये राज्याचा दर्जा बहाल करणे आणि स्थानिक लोकांच्या जमिनी आणि नोकऱयांच्या हक्कांचे संरक्षण करणे हे पक्षाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले.