फावडे, बुट्टय़ांसह महिलांचा मोर्चात सहभाग : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन पाठवणार : पाठपुरावा करण्याचे तहसीलदारांचे आश्वासन
प्रतिनिधी /बेळगाव
ग्रामीण भागातील बीपीएल कार्डधारकांना रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगार देण्यात येतो, त्याप्रमाणे शहरातील गरीब महिला व पुरुषांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या मागणीसाठी बुधवारी खानापुरातील बेरोजगार महिलांचा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची सुरुवात समादेवी मंदिरापासून झाली. मुख्य बाजारपेठेतून तहसीलदार कार्यालयामध्ये मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. त्यानंतर तहसीलदार प्रवीण जैन यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहरातील महिला आपली शेतीची अवजारे बुट्टय़ा, फावडा, कुदळ, पिकास, खुरपी घेऊन या मोर्चात मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या.
यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष आय. आर. घाडी म्हणाले, ग्रामीण भागातील महिलांना वर्षाकाठी शंभर दिवसांचा रोजगार शासनातर्फे देण्यात येतो. यात सर्व खात्यांमार्फत कामे करून घेतली जातात. त्याच पद्धतीने खानापुरातील बेरोजगार महिलांनाही रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात यावी, याबाबत केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. याबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही निवेदन पाठवण्यात येणार आहे. मोर्चाला वकील संघटनेचा पाठिंबा राहील असेही यावेळी ते म्हणाले.
महिलांच्या सबलीकरणासाठी विविध उपाययोजना करा
यावेळी ऍड. सादिक नंदगडी म्हणाले, केंद्र व राज्य सरकार महिलांच्या सबलीकरणासाठी विविध उपाययोजना करत आहे. खानापूर शहरातही बेरोजगार महिलांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबे शहरात आहेत. यासाठी शहरातील महिलांनाही महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा लाभ मिळावा, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. रेवणसिद्धय्या हिरेमठ म्हणाले, कोरोनानंतर जी परिस्थिती निर्माण झाली आहे, या परिस्थितीत दारिद्रय़ रेषेखालील लोकांना जीवन जगणे कठीण झाले आहे. यासाठी केंद्र, राज्य सरकारने शहरातील लोकांनाही रोहयोत सामावून घेणे गरजेचे आहे. यावेळी रवि काडगी, रेखा गुरव यांची भाषणे झाली.
निवेदनाचा स्वीकार करून तहसीलदार प्रवीण जैन म्हणाले, ग्रामीण भागातील नागरिकांना ग्राम पंचायतीमार्फत रोजगार देण्यात येतो. त्याचप्रमाणे शहरातील लोकांनासुद्धा रोजगार उपलब्ध करून द्यावा यासाठी वरि÷ांना निवेदन पाठवून पाठपुरावा करेन, असे आश्वासन त्यांनी दिले.