मुख्यमंत्र्यांचे विद्यार्थी व पालकांना आवाहन
प्रतिनिधी /मडगाव
शालेय परीक्षा जवळ आल्या की, विद्यार्थी व त्यांचे पालक तणावाखाली येतात. त्याचा परिणाम विद्यार्थी व पालकांच्या मनावर देखील होत असतो. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी परीक्षांना उत्सवाचे स्वरूप द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. मडगाव रवींद्र भवनात आयोजित केलेल्या ‘परीक्षा पे’ चर्चा कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाअंतर्गत दक्षिण गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचे बक्षीस वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
आपले एकूण 34 मंत्र आहेत. त्यातील 28 मंत्र हे विद्यार्थ्यांचे असून उर्वरित 6 मंत्र हे पालक व शिक्षकांचे आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षांची भीती वाटू नये व विद्यार्थ्यांना परीक्षांच्या युक्त्या कळाव्यात यासाठी शिक्षक व इतर कष्ट घेत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना सर्वाची चिंता आहे. आपले पंतप्रधान वेगवेगळे उपक्रम राबवित असतात. स्वच्छ भारत मिशन, क्विट इंडिया मिशन, मेक इन इंडिया या सारखे उपक्रम त्यांनी यशस्वी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली देशात मोठा बदल होत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्घ्यमंत्री पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांना परीक्षांची भीती वाटू नये यासाठी त्यांनी ‘परीक्षेचे योद्धे’ (एक्साम वोर्रिर्स) हे पुस्तक प्रकाशित केले. हे पुस्तक विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यासाठी असून ते सर्व हायस्कूलांनी पोचले असून हे पुस्तक ऑनलाईन देखील उलपब्ध करण्यात आलेले आहे. या पुस्तकात 28 मंत्र दिले असून त्यावर आधारीत चित्रे विद्यार्थ्यांनी रेखाटली असतील.
2018 पासून माननीय पंतप्रधान देशातील विद्यार्थी, शिक्षक व पालकांकडे संवाद साधत आहे. कारण विद्यार्थ्यांच्या डोक्यातील भीती दूर करण्यासाठी त्यांचे सदोदीत प्रयत्न सुरू आहेत. आम्ही जेव्हा परीक्षेला सामोरे जात होतो, तेव्हा आमच्या मनात प्रचंड भीती असायची. कारण परीक्षा केंद्र हे इतर ठिकाणी असायचे व दहावीच्या परीक्षा ही सर्वात मोठी व महत्वाची मानली जात असे. आजच्या विद्यार्थ्यांचे पालक हे शिक्षित आहेत. त्यामुळे मुलांना व्यवस्थित मार्गदर्शन होत आहे. पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. पूर्वी दबावाखाली येऊन काही मुले आत्महत्या करायची. तसेच काहींना परीक्षेत काहीच लिहायला जमत नसे.
परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी हसत – हसत सामोरे जावे, परीक्षा हा उत्सव व्हायला पाहिजे. प्रत्येकाच्या घरात उत्सवाचे वातावरण असले पाहिजे, तेच उत्सवाचे वातावरण करण्यासाठी आज आम्ही एकत्र आलेलो आहोत. 9वी, 10वी, 11वी व 12वी अशा चार इयत्यांचे विद्यार्थी या ठिकाणी एकत्र आले आहेत. काणकोणपासून फोंडा पर्यंतचे शिक्षक या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन आलेले आहेत. कारण, त्यांना आपल्या विद्यार्थ्यांची चिंता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी शुक्रवार दि. 27 रोजी देशभरातून दिल्लीत एकत्र आलेल्या शिक्षक व विद्यार्थ्यांकडे प्रत्यक्ष संवाद साधतील. हा कार्यक्रम पाहण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. गोव्यातून दोन विद्यार्थी व एक शिक्षिका या कार्यक्रमासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत.
27 रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात सर्व हायस्कूलांनी विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी एकत्रित बसून हा कार्यक्रम पहावा असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.
या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाममंत्री निलेश काब्राल, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, आमदार उल्हास तुयेकर, आमदार आलेक्स सिक्वेरा, अनिवासी भारतीय आयुक्त नरेंद्र सावईकर, शिक्षण संचालक श्री. झिंगडे, शालांत मंडळाचे अध्यक्ष श्री. शेट्यो, शिक्षण खात्याचे उपसंचालक डॉ. उदय गांवकर, गोविंद पर्वतकर, बाबाजी सावंत, ब्रम्हानंद शंखवाळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
चित्रकला स्पर्धेचे प्रथम बक्षीस फोंडा येथील दादा वैद्य हायस्कूलचा विद्यार्थी कुणाल नाईक याने पटकावले तर वास्कोच्या कुणाल कौषिकने द्वितीय पारितोषिक प्राप्त केले. या स्पर्धेचे परीक्षण श्रीधर कामत बांबोळकर, सुनील नाईक, रचना सोनटक्के, व्हाय. बी. सुतार, प्रसाद कांदोळकर, दीपक देसाई व उत्तरा आगंले यांनी केले.