कंग्राळी खुर्द ग्रामस्थांच्यावतीने जिल्हा पंचायतीला निवेदन
बेळगाव : कंग्राळी खुर्द गावातील शेतवडीतील रस्त्याचा कृती आराखडा देऊनही तालुका पंचायतकडून व जिल्हा पंचायतकडून त्याला कोणताच प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यामुळे रस्त्याचे काम रखडले असून शेतकऱ्यांना चिखलातूनच शेतीला ये-जा करावी लागत आहे. सदर रस्ता शेतकऱ्यांसाठी धोकादायक असून त्वरित रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन कंग्राळी ग्राम पंचायत सदस्य व शेतकऱ्यांतर्फे जिल्हा पंचायतीला देण्यात आले. कंग्राळी खुर्द येथील गावच्या व्याप्तीत येणाऱ्या दिवाण मळा नावाच्या शेतवडीकडे जाणाऱ्या जवळपास दीड किलोमीटर लांबीच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्ता अरुंद असल्याने पावसाळ्यात गुडघाभर चिखलातून शेतकऱ्यांना वैरण आणण्यासाठी व शेतीकामांसाठी ये-जा करावी लागत आहे. अनेक त्रास सोसून शेत गाठावे लागत आहे.
सदर रस्त्याच्या कामासाठी 2022-23 मध्ये तालुका पंचायतीला आर्थिक मंजुरीसाठी कृती आराखडा सादर करण्यात आला होता. मात्र, तालुका पंचायतीकडून जिल्हा पंचायतीला पाठविण्यात आल्याचे सांगून वेळ मारून नेण्यात आली आहे. यामुळे सदर कृती आराखड्याचे काम रखडले आहे. परिणामी शेतकऱ्यांना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. सदर बाब लक्षात घेऊन त्वरित रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी ग्रा. पं. सदस्यांकडून करण्यात आली. अनेकवेळा पाठपुरावा करूनही तालुका पंचायतीकडून दिशाभूल करण्यात आल्याबद्दल सदस्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. ग्रा. पं. उपाध्यक्ष कल्लाप्पा पाटील, सदस्य यल्लाप्पा पाटील, चेतक कांबळे, प्रशांत पाटील, वैजनाथ बेन्नाळकर, राकेश पाटील, लता पाटील, कमला पाटील, मीना मुतगेकर, रेखा पावशे, सुनीता जाधव, विनायक कम्मार, शेतकरी रामभाऊ पाटील, पी. डी. पाटील, प्रल्हाद पाटील आदी उपस्थित होते.