डबल इंजिन सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचवा : कार्यकर्ता संवाद मेळाव्यात मार्गदर्शन
प्रतिनिधी/कोल्हापूर
2024 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत आपल्याला आपला पक्ष राज्यातील प्रत्येक घराघरात न्यायचा आहे. त्यासाठी आता पासूनच कामाला लागा, दररोज चोवीस तासातील केवळ दोन तास पक्षाच्या कामासाठी द्या, या दोन तासात चार घरातील कुटुंबांना भेटा, त्यांना आपल्या पक्षाचा विचार, केंद्र आणि राज्यातील सरकारचे कार्य, योजना समजावून सांगा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हय़ातील भाजपच्या कार्यकर्त्यांना शनिवारी केले.
राज्यातील चेवीस जिल्हय़ांचा दौरा करून कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये झालेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात मार्गदर्शन केले. यावेळी माजी राज्यमंत्री भरमू सुबराव पाटील, भाजपचे नेते मकरंद देशपांडे, हिंदूराव शेळके, पुण्याचे मुरलीधर मोहोळ जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव, सत्यजित कदम, अजित ठाणेकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह खाडे-पाटील आदींसह शहर आणि ग्रामीण भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी तासभराच्या आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना मागदर्शन करताना जुन्या भाजप नेत्यांनी दिलेल्या योगदानाचीही आठवण करून दिली. ते म्हणाले, जगातील सर्वात मोठा, सर्वाधिक 18 कोटी सदस्य संख्या असणारा आपला पक्ष आहे. महाराष्ट्रात अडीच कोटी भाजपचे कार्यकर्ते आहेत. बुथ लेव्हलपासून शक्ती, मांडल, जिल्हा आणि राज्य आणि देशस्तरापर्यंत आपल्या पक्षाची रचना आहे. पक्षात नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांना मान आहे. कोणताही पक्ष कार्यकर्त्यांच्या कार्याच्या जोरावर वाढतो, मोठा होतो. भाजपचे पहिले अध्यक्ष उत्तमराव पाटील यांनी त्याकाळी कोणत्याही पदाची अपेक्षा न बाळगता पक्ष रूजविणे, वाढविण्याचे कार्य केले. ना. स. फरांदे, गोपिनाथ मुंडे, प्रमोद महाजन, नितीन गडकरी, चंद्रकांतदादा पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेत्यांनी राज्यात पक्ष वाढविला. कोरोनाच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री 18 महिने घरात असताना देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्य पिंजून काढत जीवाची पर्वा न करता राज्यातील जनतेला दिलासा दिला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी जनतेची सेवा केली. ही आपल्या पक्षाची ताकद आहे.
बावनकुळे म्हणाले, 2024 मध्ये मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे. केंद्र सरकारने आणलेल्या सर्व जनहिताच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यरत राहा. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार असे डबल इंजिनचे सरकार देश आणि राज्याच्या विकासासाठी कार्यरत आहे. मोदी सरकारने गोरगरीबांसाठी आणलेल्या योजनांचा राज्यातील 5 कोटी 65 लाख लोकांना लाभ झाला आहे. त्याबद्दल धन्यवाद मोदीजी उपक्रमाव्दारे जनता आभार व्यक्त करत आहे, असे त्यांनी सांगितले.
पक्षासाठी दररोज तास द्या
2024 मध्ये लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक आहे. तो पर्यंत प्रत्येक कार्यकर्त्यांने आपल्या दररोजच्या दिवसातील दोन तास पक्षाला द्यावेत. त्याने या दोन तासात चार घरात पक्षाचा विचार पोहचवावा, सरकारच्या योजना, कार्य पोहचवावे, प्रत्येक बुथवर शंभर मतदान भाजपला झाले पाहिजे, यासाठी नियोजन करा, जनतेला केंद्र आणि राज्यातील सरकार आपले वाटले पाहिजे, अशा पद्धतीने कार्य करा, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
सर्व्हे करून मेरिटवर उमेदवारी देणार
नजीकच्या काळात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हापरिषद, महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांसाठी समरजितसिंह घाटगे, राहुल चिकोडे तुम्ही मतदार संघ निहाय तीन नावांची यादी पाठवा. त्या ठिकाणी सर्व्हेक्षण केले जाईल. ज्या इच्छुकाला जनतेत 70 टक्के पसंदी मिळेल, ए प्लस मिळेल, त्याला उमेदवारी दिली जाईल. नेत्यांच्या पाठीमागे पळणाऱयांना तिकीट दिले जाणार नाही, अशा शब्दात बावनकुळे यांनी सुनावले.
खासदार महाडिक यांना बावनकुळे यांनी दिल्या शुभेच्छा
सिकंदर टाकळी येथील भिमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांच्यासह त्यांचे कुटुंबीय व्यस्त आहेत. त्यामुळे ते बावनकुळे यांच्या या दौऱ्यातील कार्यक्रमांना उपस्थित राहू शकले नाहीत. त्याबद्दल त्यांनी पक्ष नेतृत्वाची परवानगीही घेतली आहे. मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी खासदार महाडिक यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
बावनकुळे यांनी दिलेल्या उपमा
पंतप्रधान नरेंद्र मोदी विश्वगुरू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अष्टपैलू नेतृत्व, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदूत्वासाठी सत्तेला लाथ मारणारा लढवय्या मराठा, राज्यातील सरकार शिवशाहीचे सरकार, देवदुर्लभ कार्यकर्ते (भाजपचे कार्यकर्ते) अशा उपमा बावनकुळे यांनी या मेळाव्यात दिल्या.
बावनकुळे म्हणाले…
देशात राहणाऱयांना वंदेमातरम् म्हणावे लागेल.
अफजलखानाच्या कबरीजवळील अतिक्रमणाचे समर्थन करणारे सरकार एकनाथ शिंदेंनी उद्धवस्त केले.
-महाविकास आघाडीचा विकासातील बॅकलॉग शिंदे-फडणवीस सरकार भरून काढणार.
-इमानदारीने कार्य करणाऱया कार्यकर्त्याचा सन्मान.