काँग्रेसच्या चिंतन शिबिरात राहुल गांधींचे वक्तव्य : सत्तेवर परतू असे सोनियांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था / उदयपूर
राजस्थानच्या उदयपूरमध्ये काँग्रेसचे 3 दिवसांचे चिंतन शिबिर समाप्त झाले आहे. पक्षाने एक कुटुंब-एक तिकीट, संघटनेत युवांना प्राधान्य, देशभरात पदयात्रांचे आयोजन यासारखे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. तर या शिबिरात राहुल गांधी यांनी पक्षाचा कायापालट करण्याचा मंत्र दिला. आम्ही पुन्हा जनतेदरम्यान जाऊ, त्यांच्यासोबतचे नाते मजबूत करू. हे काम शॉर्टकटने होणार नाही, घाम गाळून म्हणजेच अथक परिश्रमानेच हे साध्य होणार असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. राहुल यांनी यावेळी नेत्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. लढाई मोठी असल्याने नैराश्यात जाऊ नका असे उद्गार त्यांनी काढले आहेत. तर पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेस पुन्हा सत्तेवर परतणार असल्याचे विधान केले आहे.
आमचा पक्ष जनतेतूनच तयार झाला आहे. हाच आमचा डीएनए आहे. ही संघटना जनतेतूनच तयार झाली आहे. आम्ही पुन्हा जनतेदरम्यान जाऊ. ऑक्टोबरमध्ये पूर्ण काँग्रेस पक्ष जनतेदरम्यान जाईल, यात्रा करणार आहे. जनतेसोबतचे नाते पुन्हा मजबूत केले जाईल. हाच एक मार्ग असून कुठल्याही शॉर्टकटने हे साध्य होणार नसल्याचे राहुल म्हणाले.
ही लढाई प्रादेशिक पक्ष लढू शकत नाहीत. ही लढाई केवळ काँग्रेसच लढू शकतो. प्रादेशिक पक्ष भाजपला पराभूत करू शकत नाहीत, कारण त्यांच्याकडे विचारसरणी नाही. मला कुठलीच भीती नाही, मी कुणाकडून एक रुपया देखील घेतलेला नाही तसेच कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार केलेलानाही. सत्य बोलण्यास मी घाबरत नसल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.
देशासमोर संकट
देशासमोर नवे संकट उभे ठाकणार आहे. मी कोरोनापूर्वी सतर्क केले होते, आता पुन्हा बोलत आहे. भाजप नेते देशाच्या संस्था मोडीत काढत आहेत. जितक्या संस्था संपतील, तितकीच ही आग लागणार आहे. देशात ही आग लागू देऊ नये ही आमची जबाबदारी आहे. हे काम केवळ काँग्रेस करू शकते. या देशातील कुठलाही धर्म, जात, व्यक्तीकरता काँग्रेसचे दरवाजे बंद नाहीत. काँगेस सर्वांचा पक्ष असल्याचे राहुल यांनी नमूद पेले. तर सोनियांनी शिबिर समारोपावेळी बोलताना 2 ऑक्टोबरपासून भारत जोडो अभियान सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे.
काँग्रेस कार्यकारिणीकडून मोहोर
शिबिरामध्ये रविवारी काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत पक्षामधील बदलांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. काँग्रेस संघटन आणि राजकारणाशी संबंधित समितीच्या शिफारसीच्या आधारावर आता एका परिवारातून एकालाच तिकीट या सूत्राला मंजुरी देण्यात आली आहे. परिवारातील दुसऱया सदस्याला 5 वर्षांपासून संघटनेत सक्रीय असेल तरच तिकीट मिळणार आहे. 5 वर्षांपर्यंत पदाव राहिल्यावर तीन वर्षांच्या कुलिंग पीरियडचे पालन करावे लागेल. या शिफारसींना कार्यकारिणी समितीकडून मंजुरी मिळाली आहे.
आगामी निवडणुकांवर लक्ष
2024 पूर्वी होणाऱया 10 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवर पक्षाचे लक्ष आहे. यात राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय, नागालँड, तेलंगणा सामील आहे. गुजरात आणि हिमाचलमध्ये विजयी न झाल्यास 2024 ची निवडणूक विसरावी लागेल असे बैठकीत गुजरातचे पक्षप्रभारी रघु शर्मा यांनी म्हटले आहे.