उमदी/वार्ताहर
जर महाराष्ट्र शासनाने आम्हाला पाणी नाही दिलं तर आम्ही कर्नाटकात जाऊ असा इशारा पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनिल पोतदार यांनी सभेप्रसंगी बोलताना दिला. कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी केलेल्या विधानावर जत तालुक्यातील पाण्यावरून मोठं वादंग निर्माण झाले असून जत पुर्व भागातील पाणी संघर्ष समितीच्या वतीने उमदी येथे सभा आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते.
यावेळी अध्यक्ष सुनिल पोतदार म्हणाले की, गेली अनेक वर्षे आम्ही पाण्यासाठी संघर्ष करतोय मात्र महाराष्ट्रातील कोणत्याच पक्षाच्या लोकांनी गांभीर्याने घेतले नाही. तर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी जत पुर्व भागातील ४२ गावे कर्नाटकात घेणार असे म्हणताच महाराष्ट्र शासन व विरोधी नेते जागे झाले. मात्र तुम्ही लवकरात लवकर आम्हाला पाणी कधी देणार हे उमदीत येऊन सांगा अन्यथा आम्ही पुन्हा नव्याने प्रस्ताव घेऊन कर्नाटकात जाऊ , आम्ही पाकिस्तानात जात नाही तर शेजारच्या राज्यातच जातोय व आमच्या भावना या कर्नाटक सरकारला कळतात. मात्र महाराष्ट्रातील नेत्यांना समजत नाहीत असे, सुनिल पोतदार म्हणाले.
यावेळी उपाध्यक्ष अनिल शिंदे म्हणाले की, जर पाणी नाही दिले तर आम्ही शांत बसणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही किती आंदोलन केली यांचा अभ्यास करा. उमदी परिसरातील लोकांच्या भावना समजून घ्या. आम्ही तुम्हाला फक्त पाणी मागतोय जर तुम्ही आम्हाला पाणी नाही दिलं तर आम्ही कर्नाटकात जायला तयार आहोत, असे ही ते म्हणाले.
राष्ट्रवादी चे नेते चन्नाप्पान्ना होर्तीकर म्हणाले की, जयंत पाटील हे जलसंपदा मंत्री असताना त्यांनी ६ टिएमसी पाणी मंजूर केले आहे. मात्र पाणी येणार तेवढ्यात सरकार कोसळलं आणि कामाला ब्रेक बसला. जर या सरकारने आमची दखल नाही घेतली व तीन महिन्यात कामाला नाही सुरूवात केली तर आम्ही कर्नाटकात जायला तयार आहे.
काँग्रेस नेते निवृत्ती शिंदे म्हणाले की, आमदार विक्रम सावंत यांच्या विनंती नुसार कर्नाटकचे मंत्री एम.बी.पाटील हे ओव्हरफ्लो झालेलं पाणी आम्हाला सोडतात. तसेच कर्नाटकात सर्व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मोफत अनुदान दिलं जातं, जर महाराष्ट्राने आमच्या पाण्याची व्यवस्था केली नाही तर आम्ही रिट दाखल करुन जन आंदोलन उभं करु व कर्नाटकात जाऊ असा इशारा दिला.
माध्यमांना अनिल शिंदे यांची भावनिक साद
समितीचे उपाध्यक्ष अनिल शिंदे यांनी या प्रश्नावर आता माध्यमे आमचा दबलेला आवाज सरकारपर्यंत पोहचवू शकतात असे सांगून, ही लढाई आम्ही लढत असलो तरी याचे नेतृत्व माध्यमांनी स्वीकारावे. आजवर आमच्या चळवळीला पत्रकारांनी साथ दिली आहे. आता आखेरचा घाव घालण्यासाठी लेखणी तलवारी प्रमाणे चालवावी आणि आपल्या विभागाला न्याय द्यावा, अशी साद घालत आपल्या माध्यमातूनच क्रांती घडू शकते असे मत व्यक्त केले.