उत्पादन निर्मितीत पर्यावरणाला कमीत कमी हानी पोहचविणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान भारतीय कंपन्यांनी स्वीकारावे : सायबरमध्ये राष्ट्रीय परिषदेला प्रारंभ
कोल्हापूर प्रतिनिधी
वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी जागतिक स्तरावर कार्बन न्युट्रल प्रॉडक्टस् तयार करण्याची नवीन संकल्पना अस्तित्वात आली आहे. युरोप, अमेरिका, आफ्रिकेसह आशिया खंडात या नव संकपल्पेनुसार उत्पादन निर्मिती सुरू झाली आहे. आपल्या देशातील औद्योगिक क्षेत्रासह विविध क्षेत्रातील उद्योजकांनीही कार्बन न्युट्रल प्रॉडक्टस् संकपल्पेनुसार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आपल्या उद्योगात उत्पादनांची निर्मिती करावी, असे आवाहन मयुरा स्टील्स प्रा.लि.कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रवी डोली यांनी केले.
सायबर महाविद्यालयात आयोजित ‘नव्या जागतिक क्रमवारीत भारत’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी उद्योगपती डोली यांनी मार्गदर्शन केले. औद्योगिक क्षेत्रातील आपल्या प्रदीर्घ अनुभवाचे दाखले देत उद्योगपती डोली यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही उद्योग, व्यवसायातील निर्मितीत पर्यावरणाला महत्व देण्यात येत आहे. उत्पादन निर्मितीत जागतिक तापमान वाढ असो वा विविध प्रकाराचे प्रदूषण असो याचा विचार सुरू झाला आहे. कमीत कमी कार्बनडायऑक्साईडसह इतर वायूची निर्मिती उत्पादन निर्मितीत व्हावी, यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. प्रॉडक्टस्वरही कार्बन न्यूट्रल असे लिहिले जात आहेत. अशा प्रॉडक्टस्नाच आता जगातील सर्व देश आणि त्यातील कंपन्या स्वीकारत आहेत. व्यवसाय तंत्रज्ञानामध्ये खूप वेगाने होणारी प्रगती पर्यावरणाचा समतोल राखतच करावी लागणार आहे. त्यासाठी आतापासूनच आपल्या देशातील उद्योगांपुढे प्रगती साधताना पर्यावरणाचा समतोल राखण्याचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी योग्य ते नियोजन होणे गरजेचे आहे, असेही उद्योगपती डोली यांनी सांगितले.
मॉरिशस येथील तंत्रज्ञान विद्यापीठाचे प्रा. डॉ. निदेश रामफल यांनी ‘स्वयंसेवी संस्थांची विकासात्मक वाटचाल’ या विषयावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात संचालक डॉ. एस.पी.रथ यांच्या परिषद आयोजनाचा हेतू विषद केला. पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन प्रा.ओंकार बर्वे व डॉ. रचना इंगोले यांनी केले आभार प्रा. प्रिया शहा यांनी मानले.
दुसऱ्या सत्रात मॉरीशस तंत्रज्ञान विद्यापीठाचे महाव्यवस्थापक दिनेश कुमार, म्यानमारच्या यंगून विद्यापीठातील प्रा. डॉ. के. लॅग, श्रीलंकेतील बाबूनिया विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.टी. मंडलेश्वर, सावंन खेत विद्यापीठ लाओपेडीया येथील उपाध्यक्ष डॉ. बावन नेमचेन यांनी परिषदेच्या विविध विषयावर आपले संशोधनात्मक विचार मांडले. तिसऱ्या सत्रात सुमारे पन्नास हुन अधिक सहभागी सदस्यांनी आपल्या संशोधन पेपरचे वाचन केले. आज दुसऱ्या दिवशी शनिवारी परिषदेच्या समारोप प्रसंगी विविध मान्यवर विचार मांडणार असून यावेळी नरीशिंग फार्म्सचे मुख्य कार्यकारी संचालक दिवाकर बेडेकर, सायबर संस्थेचे कार्यकारी विश्वस्थ व सचिव डॉ. आर. ए.शिंदे, चार्टर्ड अकाउंटंट व विश्वस्त ऋषिकेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.