केरळच्या सामाजिक न्यायमंत्री आर. बिंदू यांचे अजब विधान : अंधश्रद्धेचा प्रकार देशभरात
वृत्तसंस्था /तिरुअनंपुरम
केरळच्या सामाजिक न्यायमंत्री डॉ. आर. बिंदू यांनी अलिकडेच झालेल्या मानवी बळीच्या घटनेवरून अजब वक्तव्य केले आहे. केरळमध्ये कथित मानवी बळीची घटना जागतिकीकरणामुळे निर्माण झालेली निराशा आणि काही प्रतिगामी शक्तींच्या पोकळ तसेच अप्रचलित कर्मकांडांना परत आणण्याच्या प्रयत्नांचा परिणाम असल्याचे त्या म्हणाल्या. अशाप्रकारच्या घटना पूर्ण देशात घडत आहेत. केरळमध्ये लोक अधिक सावध असल्याने ही घटडना लवकर समोर आल्याचा दावा मंत्री आर. बिंदू यांनी केला आहे.
अशा घटना केवळ केरळमध्येच घडतात असे मानले जाऊ नये. केरळमध्ये लोक अधिक सतर्क असल्याने अशा घटना लवकर उघडकीस येतात. देशाच्या अन्य राज्यांमध्ये अंधश्रद्धेची वृत्ती अधिक असल्याचे त्या म्हणाल्या.
भारतात अंधश्रद्धेचा प्रकार केवळ केरळपुरता मर्यादित नाही. पूर्ण भारतात हिंस आणि क्रूरतेच्या घटना वाढत आहेत. अंधश्रद्धेमागे जागतिकीकरणामुळे निर्माण झालेली निराशाही कारणीभूत असल्याचे आर. बिंदू यांनी म्हटले आहे.
जागतिकीकरणामुळे लोक लवकर पैसा कमाविण्याचा प्रयत्न करतात. अशा स्थितीत त्यांना मानवी बळीद्वारे धनसंपत्ती मिळू शकेल अशा गोष्टींमध्ये सहजपणे अडकविले जाऊ शकते. प्रतिगामी शक्ती अशा ‘पोकळ’ आणि ‘अप्रचलित’ कर्मकांडांना परत आणण्याचा प्रयत्न करत असल्यानेही मानवी बळीसारख्या घटना घडत आहेत असे त्यांनी म्हटले आहे.
केरळमध्ये अलिकडेच कथितपणे आर्थिक संकट दूर करण्यासाठी दोन महिलांचा बळी देण्यात आला होता. 42 वर्षीय महिला आर. पद्म यांची हत्या सप्टेंबरच्या अखेरच्या आठवडय़ात झाली होती. तर 49 वर्षीय रोजलिन यांची हत्या जूनमध्ये करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी शफी, भागवल सिंह आणि पत्नी लैला सध्या पोलीस कोठडीत आहेत.