कंपनीची उलाढाल 150 कोटीवरुन आली सात कोटीवर : कामगारांना वेळेवर पगार नाही
प्रतिनिधी /मोरजी
तूये गोवा ऍन्टीबायोटिक्स कंपनी डबघाईस आली असून वर्षाला 150 कोटी रुपयांची उलाढाल करणारी कंपनी सध्या सात कोटीवर पोचली आहे. त्यामुळे कामगारांना वेळेवर पगार नाही.
तुये येथील गोवा अँटिबायोटिक्स औषधाची कंपनी मागच्या तीस ते पस्तीस वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या सहकार्यातून या ठिकाणी उभारली होती. सुरुवातीला ही कंपनी तीन पाळीमधून चालत होती. त्यावेळी मोठय़ा प्रमाणात औषधाची निर्मिती केली जात होती. परंतु या कंपनीत हळूहळू राजकारण शिरल्यामुळे कंपनी सध्या डबघाईस येण्याच्या मार्गावर आहे. कंपनीची जागाही कंपनीला सुरक्षित ठेवता आलेली नाही.
कामगारांना मिळतो केवळ 50 टक्के पगार
येथील कामगारांना मागच्या दहा महिन्यापासून 50 टक्केच पगार दिला जातो. कामगारांना काम करण्याचीही त्या ठिकाणी सोय नाही. व्यवस्थापक मंडळही या कंपनीत जास्त प्रमाणात औषध निर्मिती व्हावी किंवा सरकार ही कंपनी वाचवण्यासाठी कोणत्याच हालचाली करत नसल्याचा दावा कामगारनेत्यांनी केला.
आमदार आरोलकरांनी घातले लक्ष
याविषयी काही कामगारांनी स्थानिक आमदार जित आरोलकर यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार आमदार जित आरोलकर यांनी कंपनीच्या अधिकाऱयांकडे चर्चा केली. चर्चेच्या दरम्यान आठ दिवसाच्या आत उर्वरित कामगारांचा पगार दिला जाईल, असे आश्वासन दिले. परंतु या कंपनीमध्ये जास्तीत जास्त औषध निर्मिती करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या नाही. असा दावा या वेळी कामगारांनी केला.
आमदार जित आरोलकर यांनी स्थानिक पत्रकारांकडे बोलताना सांगितले गोवा अँटिबायोटिक्स औषधाची कंपनी मागच्या तीस वर्षापासून तुये गावात सुरू केली होती. त्या काळात या कंपनीमध्ये अडीचशे पेक्षा जास्त कामगार कामावर होते. काही कामगारांनी दुसरीकडे आपली सोय केली त्यामुळे जी कामाची कमतरता आहे किंवा कामगार क्षमता वाढवून वाढवायची आहे. ती क्षमता वाढवली नाही. सध्या 160 कामगार कार्यरत आहेत. परंतु या 160 कामगारांना मागच्या दहा महिन्यापासून 50 टक्के पगार दिला जातो. त्यामागचे मूळ कारण म्हणजे या ठिकाणी उत्पादन जास्त होत नसल्याने आणि कंपनीचे काही पैसे बाजारात असल्याने तेही वेळेवर मिळत नसल्याने पगार देताना अडचणी निर्माण झाल्या असे आमदार जित आरोलकर यांनी सांगितले.
160 कामगारांमध्ये 3 कामगार संघटना
या कंपनीमध्ये 160 कामगार नियमित काम करत असतात परंतु या 160 कामगारांमध्ये तीन कामगार संघटना आहेत. त्यात ख्रिस्तोफर फोन्स?का, पुतू गावकर ,आणि श्री संतोष प्रशांत अशा 3 कामगारांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटना कार्यरत आहे. याबद्दल तिन्ही कामगारांच्या प्रतिनिधींना विचारणा केली असता सुरुवातीला काही कामगार पूर्णवेळ कामाला कंपनी घेत नव्हती. त्यावेळी विविध प्रकारच्या तीन्ही कामगार नेत्यांनी प्रयत्न करून काही कामगारांना कायमस्वरूपी नोकरी मिळवून दिलेली आहे. त्यामुळे तीन संघटना आहे परंतु तिन्ही संघटनांमध्ये कसल्याच प्रकारचे मतभेद नाहीत. तीन संघटना पुन्हा एकदा एकत्रित ठेवून एकच कामगार संघटना करावी अशी सूचना यावेळी आमदार जित आरोलकर यांनी कामगार प्रतिनिधींना केली.
हक्काचा पगार मिळायला हवा : नर्से
कामगार प्रतिनिधी श्री नर्से यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले की आम्हाला आमचा हक्काचा पगार मिळायला हवा. शिवाय कंपनीने आम्हाला कामही वेळेवर द्यावे.आम्हाला बसून पगार नको. आम्ही उत्पादन करण्यासाठी तयार आहोत. शिवाय जे 50 टक्के आमचा पगार कापून वेगवेगळय़ा सोसायटी मधून कर्ज म्हणा किंवा इतर सुविधा आहेत. त्यासाठी पुरवले जाते किंवा आमचा पीएफ आम्हाला वेळेवर मिळत नाही तोही प्रश्न सोडवावे,अशी मागणी नर्से यांनी यावेळी केली.