मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता, : ’पार्टटाईम उद्योग’ बंद करण्याचा शिक्षकांना इशारा
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील मुले गणितात मागे पडत आहेत ही चिंतेची बाब असून त्यादृष्टीने शिक्षकांनी खबरदारी घेतली पाहिजे, शिक्षकांनी आता आपले ’अतिरक्त उद्योग’ बंद करून पूर्णवेळ शिकवणीकडे लक्ष द्यावे, असा आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे.
सरकारी अनुदानप्राप्त शाळांची संख्या वाढत असली तरीही राज्यातील शैक्षणिक दर्जा मात्र ढासळत आहे, याबद्दल मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे. सरकारकडून पगार तसेच अन्य पाठिंबा मिळविणाऱया अनुदानित शाळांनी आपला शैक्षणिक दर्जा वाढविण्यावर भर दिला पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
काल मंगळवारी पर्वरीत शिक्षण संचालनालयातील अधिकाऱयांच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. राष्ट्रीय पातळीवर करण्यात आलेल्या सर्वेक्षण अहवालातून खास करून गत दोन वर्षात राज्यातील बहुतेक विद्यार्थ्यांचा गणिताचा दर्जा राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत खालावला असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या अधिकाऱयांची बैठक घेऊन दीर्घ चर्चा केली. शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, एनसीईआरटीचे संचालक नागराज होन्नेकरी आणि अन्य अधिकारी त्यावेळी उपस्थित होते.
गणितातील टक्केरीवारी कमी
विद्यार्थ्यांची गणितातील राष्ट्रीय सरासरी इयत्ता दहावीसाठी 32 टक्के एवढी असून गोव्यातील विद्यार्थ्यांची सरासरी 2 टक्के कमी म्हणजे 30 टक्के एवढी आहे. आठवीच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय सरासरी 36 टक्के तर गोव्याची 32 टक्के आहे. पाचवीच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय सरासरी 44 टक्के तर गोव्याची 39 टक्के आहे. त्याशिवाय तिसरीच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय सरासरी 57 टक्के तर गोव्याची सरासरी 57 टक्के एवढी असल्याचे अहवालात म्हटले आहे.
हा फरक नगण्य वाटत असला तरीही कमी आहे ही वस्तुस्थिती असल्यामुळे शिक्षकांनी खबरदारी ही घेतलीच पाहिजे. विद्यार्थ्यांच्या एकुणच भवितव्याच्या दृष्टीने सर्वच विषयात राज्याचा शैक्षणिक दर्जा उंचावलेला असला पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
गोवा भाषा विषयात अव्वल
त्यावेळी बोलताना होन्नेकरी यांनी, गोव्यातील मुले भाषा विषयात अव्वल असल्याचे सांगितले. खास करून इंग्रजी विषयात गोव्यातील दहावीच्या मुलांची प्रगती राष्ट्रीय सरासरीपेक्षा कैकपट जास्त आहे. इयत्ता तिसरीतही गोव्यातील मुले राष्ट्रीय सरासरीच्या एक टक्का पुढे आहे. राष्ट्रीय सरासरी 62 टक्के एवढी आहे. पाचवी इयत्तेत गोव्यातील मुले राष्ट्रीय सरासरीच्या बरोबरीनेच आहेत. तसेच आठवीत राष्ट्रीय सरासरीच्या (55 टक्के) तुलनेत गोव्याची सरासरी 63 टक्के एवढी असल्याचे त्यांनी सांगितले.
एनसीईआरटीकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर हे मुल्यांकन करण्यात येत असल्याचे सांगून एकुणच मुल्यांकन पद्धतीची माहितीही होन्नेकरी यांनी दिली.
सरकारी, खासगी विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण
इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात खाजगी, सरकारी, अनुदानित तसेच विना अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्या अहवालानुसार सर्वच इयत्तांमधील विद्यार्थ्यांचा गणिताचा दर्जा खालावला असल्याचे दिसून आले आहे. त्यामानाने भाषा, विज्ञान, व्यावसायिक शिक्षण, पर्यावरण, या विषयात त्यांनी सरस कामगिरी नोंदविली आहे.