मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : ’मन की बात’ नंतर व्यक्त केला विश्वास,पंतप्रधानांबद्दल काढले प्रशंसोद्गार
प्रतिनिधी /पणजी
भारतातील सर्वात पसंतीचे स्टार्टअप केंद्र म्हणून गोव्याची ओळख निर्माण करणार असून या क्षेत्रात भारताच्या यशोगाथेत योगदान देण्यासाठी गोवा सज्ज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रविवारी आपल्या ’मन की बात’ कार्यक्रमातून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री बोलत होते.
स्टार्टअप्स् संपत्ती आणि मूल्य निर्माण करत आहेत, या पंतप्रधानांच्या विधानाचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत करताना त्यांनी या क्षेत्रात योगदान देण्यासाठी गोवा सज्ज असल्याचे प्रतिपादन केले.
भारताच्या यशोगाथेत गोवा योगदान देणार
गोवा स्टार्टअप धोरण आणि तुये येथे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसह इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरमुळे स्टार्टअप क्षेत्रातील भारताच्या यशोगाथेत योगदान देण्यास गोवा सज्ज आहे, असे सावंत म्हणाले.
भारतातील सर्वात पसंतीचे स्टार्टअप केंद्र म्हणून गोव्याला नवी ओळख देणे तसेच 2025 पर्यंत आशियातील सर्वात मोठय़ा 25 स्टार्टअप केंद्रांमध्ये स्थान प्राप्त करून देणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे, असे डॉ. सावंत पुढे म्हणाले.
यंदा देशात 75 ठिकाणी ’योग’ दिन कार्यक्रम
‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमाचा भाग म्हणून यंदा देशातील 75 प्रमुख ठिकाणी ’आंतरराष्ट्रीय योग दिनाचे’ आयोजन करण्यात येणार आहे. केले जाईल. ’योग’ ही भारताने जगाला दिलेली सर्वोत्तम भेट असून नेत्रदीपक दृश्यांसह ती जगासमोर प्रदर्शित करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.