भाजप नेत्या आणि माजी टिकटॉक स्टार सोनाली फोगट यांच्या मृत्यूने गोव्याची प्रचंड बदनामी झाली आहे. गोवा हे छोटे राज्य. या ठिकाणी नेहमीच शांतता आढळून येते. येथे कधी धार्मिक तणाव किंवा दंगे होत नाहीत. म्हणून पर्यटक गोव्याला पहिली पसंती देतात. मात्र गेल्या काही वर्षांत ज्या घटना घडल्या, त्यातून गोव्याची बदनामीच अधिक झाली. मुळात ज्या घटना घडल्या, त्यात मूळ गोवेकरांचा काहीच सहभाग नाही. उलट, या ठिकाणी इतर राज्यांतून आलेल्या किंवा स्थायिक झालेल्या लोकांनीच गोव्याची बदनामी केली. हे असे प्रकार आणखी किती दिवस शांतताप्रिय गोवेकर सहन करणार? हा खरा प्रश्न आहे.
गोव्याला बदनाम करण्याचे जणू षडयंत्रच सुरू आहे. गोव्यात कुणीही यावे आणि हवे ते करून जावे आणि त्यानंतर गोव्याची राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनामी करावी. आज सोशल मीडियावरून एखादे वृत्त वाऱयासारखे सर्वत्र पसरते. सोनाली फोगटच्या बाबतीतही असेच झाले. तिला संशयास्पद मृत्यू आल्यानंतर बातमी सर्वत्र पसरली. त्यात सोनाली भाजपच्या नेत्या असल्याने त्याला अधिक ठळकपणे प्रसिद्धी मिळाली.
गोवा हे पर्यटन स्थळ असल्याने काही गोष्टी या ठिकाणी घडतील, असे गृहित धरले तरी कुणीही यावे व हवे ते करून जावे, असा जो समज बनलेला आहे, तो कायमस्वरुपी मिटण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारला कठोर पावले उचलावी लागतील. जोपर्यंत सरकार कठोर पावले उचलणार नाही तोवर गोव्याची बदनामी थांबणे कठीण. गोव्यात घडणाऱया वाईट गोष्टी रोखण्यासाठी सरकारला अगोदर पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करावी लागेल. त्यात राजकीय हस्तक्षेपाला वाव देऊ नये.
सोनाली फोगटच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी अगोदर तिला हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू आल्याचे विधान केले. हेच विधान गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उचलून धरले. वास्तविक मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल माहिती जाणून घेतल्याशिवाय किंवा शवचिकित्सा अहवाल हाती आल्याशिवाय विधान करणे उचित नव्हते. मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान राष्ट्रीय पातळीवर बरेच गाजले. गोव्यात विरोधी पक्षांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या विधानाची खिल्ली उडविली. कोरोना महामारीच्या काळात देखील मुख्यमंत्र्यांनी ‘भिवपाची गरज ना…’ असे विधान केले. त्यावेळी देखील विरोधकांनी त्यांची खिल्ली उडविली होती.
बऱयाचवेळा पोलीस अधिकारी हात झटकून मोकळे होतात. त्यांना तपास करायचा नसल्यास थातूर मातूर कारणे सांगून मोकळे होतात. सोनाली फोगटच्या मृत्यू प्रकरणातसुद्धा पोलीस अधिकारी शवचिकित्सा अहवाल हाती येण्यापूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, असे कारण सांगून मोकळे झाले. मात्र तिच्या नातेवाईकांनी गोव्यात येऊन हे प्रकरण खुनाचेच असल्याचा मुद्दा लावून धरला. त्यामुळे पोलिसांना तपासाची दिशाच बदलावी लागली.
‘हृदयविकाराच्या झटक्याने निधन’ या पोलीस अधिकारी व मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानातून देशभरात तो चर्चेचा विषय बनला. पोलीस अधिकारी व मुख्यमंत्री कोणाची तरी पाठराखण करीत असल्याचा आरोपही झाला. आम्ही सोनाली फोगटच्या शवचिकित्सा अहवालाची प्रतीक्षा करतोय किंवा आम्ही तिच्या जवळच्या नातेवाईकांचे म्हणणे ऐकून घेऊ व त्यानंतरच अधिकृत भाष्य करू, असे जरी पोलीस अधिकाऱयांनी व मुख्यमंत्र्यांनी म्हटले असते तर काही प्रमाणात गोव्याची बदनामी राष्ट्रीय पातळीवर टळली असती.
गोव्यात येणाऱया पर्यटकांना अनेकावेळा संशयास्पद मृत्यू आला आहे. असेच एक प्रकरण गाजले होते, ते ‘स्कार्लेट’ या विदेशी तरुणीच्या खून प्रकरणाचे. त्यावेळी देखील गोव्याची बदनामी झाली होती. विदेशी पर्यटकांना संशयास्पद मृत्यू आल्यानंतर गोव्याची बदनामी विदेशात होते आहे. गोव्यात मोठय़ा प्रमाणात ड्रग्ज व्यवसाय चालतो. पोलीस कारवाई करतात. पण ड्रग्ज प्रकरणाचा तपास कधीच सखोल होत नाही. ड्रग्ज प्रकरणाचा सखोल तपास का होत नाही? याची कारणे अनेक असतील. पण मुख्य कारण म्हणजे यातून काही लोकांना मोठय़ा प्रमाणात होणारी आर्थिक प्राप्ती हेच आहे. सोनाली फोगटला गोव्यात आणून तिचा अत्यंत पद्धतशीरपणे खून करण्यात आला. त्यासाठी तिचा पीए सुधीरपाल सांगवान आणि दुसरा सहकारी सुखविंदर सिंग यांनी ड्रग्जचा वापर केला. ड्रग्जचा ओव्हरडोस झाल्याने सोनाली फोगटला मृत्यू आल्याची चर्चा आज सर्वत्र आहे आणि पोलिसांनी ड्रग्ज पुरवठा करणाऱयांना अटक केली आहे.
या प्रकरणाचा पोलीस किती खोलात जाऊन तपास करतात? यावर बरेच काही अवलंबून आहे. पोलीस कुणाचीही पाठराखण करीत नाही, हे पोलीस तपासातून सिद्ध होण्याची गरज आहे. पोलिसांनी ‘ड्रग्ज पॅडलर’ रामदास मांद्रेकर यालाही गजाआड केले आहे. रामदास मांद्रेकरचे अन्य साथीदार कोण? हे देखील पोलिसांनी शोधून काढले पाहिजे. या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा हरियाणातील असल्याचे सांगितले जात आहे. गोवा पोलीस तिथेपर्यंत जाऊन तपास करणार की, हे प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करणार, हे लवकरच स्पष्ट होईल. गोव्याची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न झालेला आहे; तो या प्रकरणाचा सखोल तपास करून काही प्रमाणात सुधारण्याचादेखील प्रयत्न व्हायला पाहिजे.
महेश कोनेकर