सरकारी नोकरी असणाऱया मुलाशीच लग्न करण्याचा निर्धार अनेक मुलींनी केलेला असतो. कारण सरकारी नोकरी ही सुरक्षित मानली जाते. तसेच रजा व इतर सोयीही बऱयाच असतात आणि निवृत्तीनंतरची सोयही केली जाते. तथापि, पश्चिम बंगालमधील कूचबिहार येथे एका तरुणीला असा अनुभव आला आहे की हा विचार बदलावा लागणार की काय, असे इतर तरुणींना वाटावे. या तरुणीचा विवाह प्रणब रॉय नामक एका युवकाशी ठरला. तिच्या घरचे अत्यंत आनंदात होते. कारण रॉय याला सरकारी नोकरी होती. तो जलपाईगुडी येथील एका शाळेत शिक्षक होता. काही दिवसांपूर्वी दोघांचा समारंभपूर्वक विवाहही साजरा झाला.
प्रणब रॉय आपल्या नवपरिणित वधूला घेऊन आनंदात आपल्या घरी परतला आणि त्याच दिवशी त्याला न्यायालयाने दिलेला एक निर्णय समजला. त्या निर्णयानुसार राज्यात करण्यात आलेली 842 शिक्षकांची नियुक्ती अवैध मानण्यात आली होती. दुर्दैवाने या 842 शिक्षकांच्या सूचीत त्याचेही नाव होते. नववधू माप ओलांडून सासरी येते न येते तोच ही दुःखद वार्ता आकाश कोसळल्यासारखी त्यांच्या कुटुंबावर कोसळली होती. आनंदाचे रूपांतर क्षणार्धात दुःखात झाले होते.
काही वेळातच हे वृत्त सोशल मीडियावर वाऱयासारखे पसरले. अनेकांनी त्यावर टिप्पणी केली होती. गुरुवारी लग्न झाले, शुक्रवारी नोकरी गेली आणि शनिवारी लग्न मोडले, अशा तऱहेच्या कॉमेंट्स करण्यात येत होत्या. न्यायालयाने हा निर्णय दिला होता. कारण पश्चिम बंगालमध्ये शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आला होता. या 842 शिक्षकांना भ्रष्टाचाराच्या माध्यमातून नोकरी देण्यात आली होती, असे न्यायालयाने निर्णयपत्रात म्हटले होते. त्यामुळे प्रणब रॉय आणि त्याची पत्नी यांची अवस्था दैव देते आणि कर्म नेते अशी झाली आहे.