अध्याय सोळावा
विभूती सांगून झाल्यावर भगवंत म्हणाले, भक्ताने मत्परायण होऊन, भक्तीयुक्त बुद्धीने, मन, वाणी आणि प्राणांचा संयम करावा. असे केल्याने तो कृतकृत्य होतो. अशा प्रकारे सावधान वृत्तीने जो माझे भजन करतो त्याच्या विषयवासना जळून जातात आणि निर्विकल्प अशी शांती उत्पन्न होते.
भक्तीमार्गाने चालू लागले असता सर्व साधने लाजून जातात. भक्तीसाठीच मी लक्ष्मीपती प्रगट होऊन माझ्या भक्तांच्या संसाराची निवृत्ती करून टाकतो कारण माझ्या भक्ताला जर संसाराची बाधा होईल, तर त्याची लाज मलाच असते. म्हणून मी माझ्या भक्तांची गांजणूक होऊ देत नाही. मी श्रीकृष्ण आपल्या भक्तांना कधीही कमीपणा येऊ देत नाही. भक्तांच्या पायांची माती मी आपल्या हृदयावर धारण करतो. इतकेच नव्हे तर भावार्थी असलेली अस्वले व माकडेसुद्धा मी माझ्या पंक्तीला बसविली. म्हणूनच उद्धवा ! मी तुला पुनः पुन्हा सांगतो की, माझी भक्ती करावी. माझे भजन केले असता भक्त सहज मद्भवाला पावतात. सर्वत्र माझीच भावना धरून माझे भजन केले असता मी अनंत त्यांच्या हाती सांपडतो आणि शेवटी मी त्यांचा सेवक होतो, इतकी मला भक्तीची प्रीती आहे. येथे माझ्या भक्तीपेक्षा सुलभ असे दुसरे साधनच नाही, हे जाणूनच मी तुला भक्तीमार्गाला लावले आहे. सद्भक्ती लावून घेतली की, ती लागते आणि सद्भक्ती लागली की, मग संसार तो बिचारा काय ! माझे भक्त चारही मुक्तींना बाजूस सारून आत्मसुखाचा उपभोग घेतात. माझ्या भक्तांचा महिमा अत्यंत अतक्मर्य व गहन आहे. असे म्हणून श्रीकृष्ण उद्धवाला कुरवाळू लागला.
श्रीकृष्णाच्या हाताच्या स्पर्शामुळे नुकत्याच व्यालेल्या धेनूचे वासरू तिच्या पान्ह्य़ाने जसे आल्हादित होते त्याप्रमाणे तोही आल्हादयुक्त झाला. ज्याप्रमाणे चंद्राचे किरण लागले असता चकोर अंतर्बाह्य तृप्त होतो किंवा मेघाला पाहून मोर जसा आनंदाने नाचू लागतो त्याप्रमाणे उद्धवही आत्मानंदांत परिपूर्ण रंगून गेला. आपण देवाचे भक्त आहोत हेही तो विसरून गेला आणि श्रीकृष्णही आपला कृष्णपणा विसरले. याप्रमाणे भक्तीसुखामध्ये दोघेही एकरूपतेने उन्मत्त झाले, तेव्हा अर्थातच परमानंदाचा झेंडा तेथे स्वानंदाने नाचू लागला. या भक्तीसुखाची जी गोडी आहे, ती भाग्याशिवाय नीट कळावयाची नाही. उद्धवाने जो भजनरूपी व्यापार सुरू केला होता त्यामध्येच श्रीकृष्णरूपी नफा त्याला लाभला. एकनाथ महाराज म्हणतात, ते जनार्दन स्वामींना शरण गेले, म्हणूनच भजनसुखाचे रहस्य आणि भक्तांचे अंतःकरणांतील गुह्यही त्यांना एकटय़ालाच पूर्णपणे समजले. जो भक्तांचा केवळ प्राण, असा परमात्मा गोकुळामध्ये गवळी झाला व त्या गवळय़ांशीच खेळीमेळीत खेळून गोपींचा आणि गोपाळांचा त्याने उद्धार केला.
तसं बघायला गेलं तर ह्यात काही मोठेसे आश्चर्य नाही. त्याची अपूर्व कला आणि उदार लीला निराळीच आहे. ती ऐका. पर्वत, पाषाण, गवत, वृक्ष, भृंग, मत्स्य, मृग, मगर, तसेच व्यान, वनचर, सर्प इत्यादि विषारी प्राणी, पारवे, मोर इत्यादि ह्या सहवर्तमान गोकुळातील प्राणिमात्रांचाही कृपाळू व सर्वसमर्थ अशा श्रीकृष्णांनी स्वतः आपल्या लिलेनेच उद्धार केला.
श्रीरामांच्या चरित्राचा जर अभ्यास केला तर लक्षात येईल की, पित्याच्या वचनाचे निमित्त करून सीतेच्या वियोगाच्या मिषाने, श्रीरामचंद्रांनी अस्वलांचा, माकडांचा आणि राक्षसांचाही उद्धार केला. सेवेच्या योगाने अस्वले व वानर तारले आणि युद्धाच्या निमित्ताने राक्षसांचा उद्धार केला पण हेही काही मोठेसे आश्चर्य नाही कारण त्यांची लिला ह्याहूनही थोर आहे ती अशी की, अयोध्येपासून लंकेपर्यंत मार्गामध्ये जे जे वृक्ष, वनस्पती, दगडधोंडे, पर्वत, गवतासारख्या क्षुद्रवनस्पती व कृमीकीटक होते, त्या सर्वांचा रामचंद्राने आपल्या लिलेनेच उद्धार केला. अशा प्रकारे तो जनार्दन नाना प्रकारचे अवतार धारण करून सर्वांचाच उद्धार करीत असतो, त्याने मलाही पावन केले, यात आश्चर्य ते कसले ?
अध्याय सोळावा समाप्त