झारखंडच्या नेतरहाट येथील ही अंगावर शहारे आणणारी घटना आहे. या राज्यातील गुमला येथे एक चालती कार चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे खोल दरीत पडली. कारचा चक्काचूर होणार हे निश्चित होते. कार पडताना ज्यांनी पाहिली त्यांची हीच भावना झाली होती. त्यांनी या अपघाताची माहिती नजीकच्या पोलिस स्थानकात कळविली आणि ते मार्गस्थ झाले. काही वेळाने पोलिस तेथे आले. चेंदामेंदा झालेली कार आता दरीतून काढावी लागणार, याची त्यांना कल्पना असल्याने त्यांनी आपत्काल विभागाला कळविले होते. कारला दरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले, कारमध्ये किती माणसे आहेत याची माहिती नव्हती. मात्र, इतक्या भयानक अपघातातून कोणीही जिवंत वाचेल याची कल्पनाही केली जाऊ शकत नव्हती. पण जे घडले होते ते अद्भूतच होते.
मार्ग सोडून कार दरीत कोसळली खरी, पण तिने दरीचा तळ गाठला नाही. दरीतील एका मोठय़ा झाडात ती अडकून पडली होती. आतील सर्वजण किरकोळ जखमी झाले होते पण जिवंत होते. कार बाहेर काढण्यासाठी आलेल्या कर्मचाऱयांना दरीत उतरल्यावर हे दिसून आले. त्यानंतर पेनचा उपयोग करुन झाडात अडकलेली कार सुखरुप बाहेर काढण्यात आली. त्यातील चार जण सुखरुप होते. त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. आपण जिवंत आहोत यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. अशा प्रकारची घटना केवळ चित्रपटात शक्य असते. पण ती खरोखर घडली होती. कारमधील प्रवासी हे विद्यार्थी होते. कार झाडात अडकली नसती तर या घटनेचा अंत भीषण झाला असता. पण देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचे प्रत्यंतर देणारीच ही घटना होती हे निश्चित आहे.