प्रतिनिधी/ गोडोली
स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना गोगावलेवाडी गावात विधवा प्रथा कायमची मोडीत काढण्याचा निर्णय ग्रामसभेत सर्वानुमते घेतला आहे. यापुढे गावातील विधवा महिलांचा आदर राखून सन्मानाने वागणूक दिली जाईल, असे सरपंच मनिषा गायकवाड यांनी जाहीर केले.
विधवा महिलांना वेगळी वागणूक न देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्यात प्रथम जकातवाडी (सातारा) ग्रामपंचायतीने घेतला. त्यानंतर अनेक ग्रामपंचायतीने विधवा प्रथा मोडीत काढण्याचा निर्णय घेतला. तर कोरेगाव तालुक्यातील गोगावलेवाडी ग्रामस्थांनी दि. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य सुवर्णमहोत्सवी वर्षी हाच ऐतिहासिक निर्णय घेतला. विधवा प्रथा कायमची मोडीत काढण्याचा ग्रामसभेत निर्णय घेऊन काही विधवांची हिरवा खण आणि नारळांनी ओटी भरण्यात आली. यापुढे विधवा महिलेच्या बांगडय़ा फोडल्या जाणार नाहीत. त्यांना प्रत्येक शुभकार्यात सहभागी करून घेतले जाईल, असे ग्रामसभेत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी विधवा महिलांना अश्रु अनावर झाले. ’यापुढे गावात विधवा प्रथा कायमची मोडीत काढल्याचे’ उपसरपंच शंकर ओंबळे यांनी जाहीर केले.
गटविकास अधिकारी क्रांती बोराटे,सहा. गटविकास अधिकारी सपना जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेविका प्रियांका चव्हाण यांच्या पुढाकाराने गोगावलेवाडी ग्रामस्थांनी ऐतिहासिक निर्णय घेतला. यावेळी विधवा महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करून त्यांचा सन्मान केला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य दशरथ बेबले, संगिता गोगावले, सुनील भोकरे, नकुसा सापते, सुमन ओंबळे, पोलीस पाटील पांडुरंग ओंबळे, मुख्याध्यापक देवकर, तानाजी ओंबळे, ग्रा.पं कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा सेविका, गावातील ग्रामपंचायतीचे माजी पदाधिकारी, ग्रामसेवा संघाच्या महिला बचत गटाच्या महिला, नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.