एकतारी या नावातच त्या वाद्याचं वर्णन आहे. खरं तर वाद्यसंगीतात चार तारांच्या तानपुऱयापासून ते शततंत्री वीणा या नावाने ओळखले जाणारे संतूर हे वाद्यही आहे. इतका मोठा आवाका या तंतुवाद्यांच्या कुटुंबाचा आहे. प्रत्येक वाद्याचं आपलं स्वतःचं असं वैशिष्टय़ आहे. कुणी अतीव करुण बोलतं तर कुणी खळाळतं. कुणी आधारस्तंभ म्हणून काम करतं तर डबलबेस नावाचं तंतुवाद्य तर अवाढव्य असतं. मग एकतारीत असं काय वेगळं आहे? मोजून एकच तार असलेलं अगदी साधं, थोडे प्रयत्न, थोडी धडपड करून निदान सूर पुरवण्यापुरतं कुणीही हौशी तयार करू शकेल असं ते तंतुवाद्य आहे. पण खरोखरच या वाद्याची ओळख एवढीच असते का हो? ‘एकतारी’ या वाद्याला एकटं राहण्याची सवय आहे. भल्या पहाटेच उठून दारासमोरून जाणाऱया पिंगळय़ाच्या हातात कधीमधी ती ऐकू येते. त्या छोटय़ा डमरूच्या सोबतीने. पहाटेच्या वेळचं एक चमत्कारिक गूढ वलय तिच्याभोवती जाणवतं. ती फक्त षड्ज पुरवते. तो अचल स्वर. ज्याच्या आधारावर गाणं उभं राहतं तो हा षड्ज. जगाला अजून आकार आलेला नसताना उजळत्या अंधारावर स्वरांची रेघ ओढत ओढत जाणारी ती एकतारी! तिचा वैराग्याशीही खूप जवळचा संबंध आहे. नुसती दरस दीवानी असलेली मीराराणी याच एकतारीच्या सुरावर आपल्या गिरिधराची स्तुती गात असते. आपण कुणाच्या घरी होम डेकोर म्हणून ठेवलेली मीराबाईंची मूर्ती पाहिली तर हटकून हातात एकतारी दिसेल. जणुकाही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग म्हणून.
हरीनाम मुखी रंगते, एकतारी करी वाजते.
विनविते मी तुला भाववेडी मीरा,
गोड नामी तुझ्या दंगते.
अशी ही भावविभोर एकतारी. जीव आणि शिव यातली एकरूपता साधणारी. मन चंचल होऊन धावू नये म्हणून अगदी अन्य एकाही स्वराला हाक न मारणारी. ‘अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम’ अशी ठाम आणि कडवी एकरेषीय आणि एकदिश नि÷ा दुसऱया कोणत्या वाद्याला साधायची? कारण स्वरांचं इंद्रधनुष्य इथे नकोच आहे. अंतिम सत्य एकच असतं त्यामुळे विचलित होऊ नकोस असं बजावण्यासाठी एकच स्वर कायम ठेवणारी ही एकतारी म्हणूनच बैराग्याच्या हातात दिसते. सूर्याने मागे ठेवलेला केशरी पिसारा आवरत निघून जाणाऱया संध्याकाळी, एकतारी घेऊन विश्रांतीच्या ठिकाणी जाणाऱया बैराग्याच्या मुखीही हरिनाम असतं. कातरवेळी त्या वाद्याच्या तारेचा आवाज पहिल्यांदा एकसुरी वाटला तरी अनुभवाने हे कळतं की दिवसभराचा कल्लोळ एका सुरात बंदिस्त करून ती एकतारी चालली आहे. आतून शांत शांत वाटतं. पण बैरागी मात्र
डोळय़ांत शीण हातात वीण देहात फुलांच्या वेगी
अंधार चुकावा म्हणून निघे बैरागी
अशा अवस्थेत चालत असतो. ग्रेसची ही कविता आणि पंडित हृदयनाथांचा सूर…..सूक्ष्मता आपल्या सगळय़ा रंगासकट थेट मनात उतरते. एकतारी समजणं किती मोठं! किती पुण्याई लागते हो त्याच्यासाठी!
प्रतिलता म्हणून, खरं तर प्रीतिलता म्हणून रसिकांच्या मनात स्थान असलेल्या सुमनताई कल्याणपूर यांनी गायलेल्या एका अप्रतिम गीतात या एकतारीचं वर्णन आहे.
कृष्णगाथा एक गाणे जाणते ही वैखरी
एकतारी सूर जाणी श्रीहरी जय श्रीहरी
यशोदकुमार गवळणकर अशा वेगळय़ा नावाच्या कवीची ही कविता संगीतकार दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेली आहे. त्यातल्या मीरेची भक्ती आणि समर्पित वृत्ती
तारिलेसी तू कन्हैया दीनवाणे बापुडे
हीन मीरा त्याहुनीही भाव भोळे भाबडे
दे सहारा दे निवारा या भवाच्या संगरी
या ओळींमधून प्रतीत होते. इतक्मया सर्व पतितांचा तू उद्धारक आहेस तर माझाही उद्धार तू कर हे अनन्यभावाने कळकळीने विनवण्यासाठी एकतारीचा हा उल्लेख आहे. सरळ साधी पण ठाम आणि शेवटपर्यंत एकाच मतावर चालणारी एकतारीच मोक्षमार्गी माणसांची सखी बनते ती उगीच नाही. तिला डामडौल नको. तारा जुळवायची खटपट नको. ताल नको की टाळ नको. तिला हवा स्वमग्न एक सूर आणि अंतरीची नैसर्गिक लय! बस्स. बाकी काही लागत नाही. देवाची कृपा हवी असेल तर नाहीतरी मन अनेकाकडून एकाकडे यावं लागतं. मग समोर विष्णू असो किंवा विठूराया! कारण अनेकांना मिळून
एकतारी संगे एकरुप झालो
आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो
म्हणता येतं. फक्त त्याला
टिळा विरक्तीचा कपाळास ल्यालो
एवढी एकच अट असते. पूर्वी या एकतारीचा वापर करणारी खूप माणसं दिसायची हो! आपल्या पाठच्या पिढीतली माणसं सांगतील याविषयी. बैरागी, पिंगळे, भटके, फकीर अवलिया कितीतरी जण होते. याच वाद्यपरिवाराशी नातं राखून होते. आता सगळय़ाच क्षेत्रातल्या माणसांनी तिचं पार तुणतुणं करून सोडलंय. पूर्वी तमाशाच्या फडातल्या तुणतुण्याच्या सुरावरही आध्यात्मिक सवालजबाब व्हायचे. आणि आता? जाऊदे. त्यापेक्षा गाण्यात टिकून राहिलेली एकतारी पुष्कळ बरी…
तशी एकतारी बंगालातलं अतिशय लोकप्रिय वाद्य! का म्हणून विचाराल तर तिथे असणारं बाऊल संगीत आणि बंगाली कीर्तन! रवींद्रनाथ ते आधुनिक कवी, सगळय़ांनाच तिने झपाटलंय. ‘बादोल बाऊल बाजाय ऍकतारा’ असो किंवा ‘एकला चालो रे’ असो. भटक्मया वृत्तीने फिरत बसणाऱया, शय्या भूमितलं दिशो।़पि वसनं म्हणणाऱया या बाऊलांच्या वृत्तीला हे वाद्य मानवलं नसतं तरंच नवल! पण एकूण एकच तार असलेली वाद्यं जगभर सर्वत्र वापरली गेलेली आहेत. अगदी आखाती देशाच्या वाळवंटापासून ते थेट युरोप अमेरिका आणि रशियापर्यंत. या सगळय़ात कॉमन गोष्ट एकच आहे. एकतारी वैराग्य, भौतिक जीवनाविषयी अनासक्ती आणि आध्यात्मिक प्रगती दर्शवते. ‘एक एकतारी हाती भक्त गाई गीत’ म्हणणाऱया कबिरालाही स्वतःचा विसर पडला होता. आणि ‘एकतारी करी वाजते’ म्हणणाऱया मीरेलाही. मग गणपतीबाप्पांनाही काहीतरी सांगावं या भावनेने ‘एकतारी गाते अभंगा’ जन्माला आलं असावं. ‘एकतारी गाते गुरुनाम समर्था’ असं वर्णन अनुराधा पौडवाल यांनी केलेलं आहे तेही ‘त्यांच्या’ पायी वाहायला. या सर्वांशी पूर्ण विसंगत असणाऱया ‘गूंजा सा है कोई इकतारा इकतारा’ या गाण्यावरही त्या परतत्त्वाचा हलका स्पर्श जाणवल्याशिवाय राहत नाही.
के बरसे सपने बूंद बूंद
नैनो को मूंद मूंद
कैसे मै चलू देख ना सकू
अनजाने रास्ते
बस्स! गूंजा सा है कोई इकतारा इकतारा….
-ऍड. अपर्णा परांजपे-प्रभु