राधानगरी तालुक्यासह जिल्ह्यात शोककळा
सरवडे प्रतिनिधी
गोकुळ दुध संघाचे संचालक,बिद्री साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष, राष्ट्रीय काँग्रेसचे नेते विजयसिंह कृष्णाजी मोरे (वय ६२) यांचे निधन झाले. मुंबई येथे जसलोक या खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर ह्रदयासंबधी उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मृतदेह शनिवारी १८ रोजी सकाळी ८ वाजता सरवडे येथे आणला जाणार असून अंत्यदर्शनासाठी ठेवला जाणार आहे. त्यानंतर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या अकाली निधनाने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
कै.आमदार किसनराव मोरे यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र असलेल्या विजयसिंह मोरे यांच्यावर बालवयातच राजकारण व कौटुंबिक जबाबदारी पडली. ही जबाबदारी समर्थपणे पेलत संघर्षातून त्यांनी मोरे गटाला उभारी दिली. दिलदार व निखळ स्वभावातून त्यांनी माणसांचा प्रचंड मोठा संच निर्माण केला होता. समाजकारण, राजकारण, शैक्षणिक ,सहकार क्षेत्रात त्यांनी आपल्या कामातून वेगळा ठसा उमटवला. अनेक सहकारी व शैक्षणिक संस्था स्थापन्यात त्यांनी पुढाकार घेतला.तर कुस्ती खेळाला आणि, बैलगाडा शर्यतीला त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले.काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी ते सतत कार्यरत होते. हसतमुख व भारदस्त व्यक्तीमत्व असलेल्या त्यांच्या अचानक निधनाने विविध क्षेत्रासह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. तर राधानगरी तालुक्यातील एक जेष्ठ नेता हरपल्याने कॉंग्रेस व मोरे गटात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना नातवंडे, मुलगी, तीन भाऊ,भावजय,पुतणे असा मोठा परिवार आहे.