डब्ल्यूजीसी यांची माहिती : घटीसह मागणी 135 टनावर
वृत्तसंस्था /मुंबई
वर्ष 2022 च्या पहिल्या तिमाहीमध्ये भारतामध्ये सोन्याची मागणी 18 टक्क्यांनी घटून 135.5 टनाच्या घरात पोहोचली असल्याची माहिती वर्ल्ड गोल्ड कौन्सिल (डब्ल्यूजीसी) यांनी दिली आहे.
डब्ल्यूजीसीने दिलेल्या माहितीनुसार मुख्य स्वरुपात किमतीत झालेल्या वाढीमुळे मागणी घटली असून वर्ष 2021 च्या तीन महिन्यांत सोन्याची मागणी 165.8 टन राहिली होती. सोने मागणीसंदर्भात डब्ल्यूजीसीकडून सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार किमतीमुळे जानेवारी ते मार्च दरम्यान सोने मागणी 12 टक्क्यांनी घटून 61,550 कोटी रुपयांची राहिली आहे. एक वर्षाच्या अगोदर समान कालावधीत 69,720 कोटी रुपयांच्या सोन्याची मागणी राहिली होती, अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे.
किमती वाढल्याचा प्रभाव
जानेवारीत सोन्याच्या किमती वाढत गेल्याने चालू वर्षातील पहिल्या तिमाहीत 8 टक्क्यांनी वधारत सोने 45,434 रुपये प्रति 10 ग्रॅम स्तरावर पोहोचले आहे, असे डब्ल्यूजीसीचे क्षेत्रीय सीईओ (भारत) सोमसुंदरम पी आर यांनी सांगितले आहे. सोने दरात झालेली वाढ सोन्याच्या प्रत्यक्ष मागणीवर परिणाम करणारी ठरली असल्याचेही ते म्हणाले.
प्राप्त अहवालानुसार तिमाहीत देशामध्ये आभूषणांची एकूण मागणी 26 टक्क्यांनी घसरुन 94.2 टन राहिली, जी मागील वर्षातील या कालावधीत 126.5 टन होती. या दरम्यान मूल्याच्या आधारे आभूषणांच्या मागणीमध्येही 20 टक्क्यांनी घट नोंदली आहे.
जागतिक पातळीवरील मागणी
मार्च तिमाहीत सोने मागणी जागतिक पातळीवर 34 टक्क्यांनी वधारुन 1,234 टन झाली. राजकीय व आर्थिक अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांनी सोन्याच्याबाबतीत सावधगिरीची भूमिका बजावली होती, अशी माहिती अहवालामधून यावेळी देण्यात आली आहे.