वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अझरबेजानमधील बाकू येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक रायफल- पिस्तुल- शॉटगन नेमबाजी स्पर्धेत शनिवारी 50 मी. रायफल थ्री पोझिशन मिश्र सांघिक प्रकारात भारताच्या स्वप्नील कुसाळे आणि ऍशी चोक्सी यांनी सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात भारताने दुसरे स्थान मिळविताना दोन सुवर्ण आणि तीन रौप्यपदकांची कमाई केली. कोरियाने पदक तक्त्यात आघाडीचे स्थान मिळविले.
50 मी. रायफल थ्री पोझिशन मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारातील अंतिम लढतीत भारताच्या स्वप्नील आणि ऍशी यांनी युक्रेनच्या कुलिश आणि डेरिया तायकोव्हा यांचा 16-12 अशा गुणांनी पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेतील भारताचे हे दुसरे सुवर्णपदक आहे.
या स्पर्धेत महिलांच्या 10 मी. एअर रायफल सांघिक नेमबाजीत भारताच्या इलाव्हेंनिल, श्रेया अगरवाल आणि रमिता यांनी सुवर्णपदक मिळविले होते. स्वप्नील कुसाळेचे या स्पर्धेतील हे तिसरे पदक आहे. त्याने या स्पर्धेत पुरूषांच्या थ्री पोझिशन वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात दोन रौप्यपदके मिळविली आहेत. पुढील महिन्यात होणाऱया चौथ्या आणि शेवटच्या चेंगओन विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत आता भारतीय नेमबाज सहभागी होणार आहेत. चालू वर्षांच्या अखेरीस विश्व चॅम्पिययन्सशीप नेमबाजी स्पर्धा होणार आहे.