पोलिसांच्या तपासाला मोठे यश, नेमका आकडा उघड करण्यास पोलिसांचा नकार, मुंबईतील व्यापारी खून प्रकरण
प्रतिनिधी/रत्नागिरी
ठाणे येथील सराफ व्यापारी किर्तीकुमार अजय राज कोठारी हे रत्नागिरीत येताना सोने-चांदी व रोकड घेवून आले होते. याच मुद्देमालावर संशयित आरोपींनी डोळा ठेवून त्यांचा खून केला, असे पोलीस तपासात समोर आले आहे. खूनाच्या दिवशी कोठारी यांच्याकडे असलेले सोने-चांदी व रोकड पोलिसांच्या हाती लागली आहे. खूनाचा हेतू स्पष्ट करण्यासाठी हा मुद्देमाल जप्त करणे अत्यंत आवश्यक असल्याने पोलीस तपासाच्या दृष्टीने हे मोठे यश असल्याचे मानले जात आहे.
सोने-चांदीच्या व्यवसायासाठी किर्तीकुमार कोठारी हे 19 सप्टेंबर रोजी रत्नागिरीत आले होते. यानंतर कोठारी हे बेपत्ता झाल्याने त्या संबंधी त्यांचा मुलगा करण याने शहर पोलिसांत तकार दाखल केली होती. पोलिसांच्या तपासात गोखले नाका येथील त्रिमूर्ती ज्वेलर्सचे मालक भूषण खेडेकर याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने कोठारी यांचा खून केल्याचे समोर आल़े यानंतर कोठारी यांचा मृतदेह हा रिक्षात टाकून गुहागर तालुक्यातील आबलोली येथील वहाळात टाकल़ा या प्रकरणी पोलिसांनी भूषण सुभाष खेडेकर (42, ऱा खालची आळी रत्नागिरी), रिक्षाचालक महेश मंगलपसाद चौगुले (39, ऱा मांडवी सदानंदवाडी रत्नागिरी) व फरीद महामूद होडेकर (36, ऱा भाट्ये खोतवाडी) यांना अटक केली.
हे ही वाचा : सराफ व्यापारी खून प्रकरण : व्यापाऱ्याच्या जबड्यात हात घालून दोरीने गळा आवळला
पोलीस तपासात भूषण खेडेकर हा कर्जबाजारी झाला होता. तसेच तो किर्तीकुमार कोठारी यांचे पैसेही देणे होता. कोठारी हे ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथील एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी होते. तसेच ते मोठे व्यापारी होते. ही गोष्ट भूषण याला माहिती होती. गेल्या 10 वर्षापासून कोठारी हे रत्नागिरीत सोने-चांदीच्या व्यवसायासाठी येत असत. त्यामुळे यावेळी कोठारी हे मोठी रक्कम आपल्यासोबत घेवून आल्याचा कयास भूषण याने बांधला होता. भूषण खेडेकर याने उधारीचे पैसे देण्याच्या बहाण्याने कोठारी यांना आपल्या दुकानात बोलावून घेतले. यावेळी दुकानात महेश चौगुले व फरीद होडेकर हे पहिल्यापासूनच हजर होते. कोठारी हे गोखले नाका येथील त्रिमूर्ती ज्वेलर्स दुकानात दाखल होताच भूषण याने दुकानाचे शटर खाली केले. तसेच संधी साधून भूषणने कोठारी यांचा दोरीच्या सहाय्याने गळा आवळून खून केला. तसेच मृतदेह रिक्षातून गुहागर तालुक्यातील आबलोली येथील पऱ्यामध्ये टाकून दिला.
कोठारी यांच्या खूनानंतर त्यांच्याजवळ असलेल्या सोने-चांदी व रोख रक्कम नेमकी कोठे गेली, या बाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. पोलिसांच्या तपासामध्ये कोठारी हे मुंबईतून घेवून आलेले सोने-चांदी व रोख रक्कम पोलिसांच्या हाती लागली आहे. नेमके किती सोने, चांदी व रोकड हे कोठारी घेवून आले होते. त्यांनी ते रत्नागिरीत कुणाकुणाला दिले, या बाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.