सनातन संस्थेचे चेतन राजहंस यांचे प्रतिपादन : फोंडय़ात हिंदू एकता दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी /फोंडा
हिंदू समाज संघटीत राहिल्यास गोमंतक समृद्ध, संस्कृत व सुरक्षित राहणार आहे. आज असंघटीत राहिलेला समाज नष्ट किंवा दुर्लभ होत चालल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे हिंदू संघटना आणि धर्मप्रेमी नागरिकांना एकसंघ ठेवण्याहेतू हिंदू एकता दिंडीसारख्या कार्यक्रमाचे आयोजन होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सनानत संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी केले.
सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदू जनजागृती समितीचे प्रेरणास्थान गुरू डॉ. जयंत आठवले यांच्या 80 व्या जयंतीनिमित्त रविवारी फोंडा शहरात काढण्यात आलेल्या हिंदू एकता दिंडीच्या प्रारंभी कार्यक्रमात ते बोलत होते. रविवारी सायंकाळी राजीव गांधी कला मंदिर येथून दिंडीला प्रारंभ झाला. यावेळी दिंडी ध्वजाचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर उद्योजक जयंत मिरिंगकर यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून दिंडीला प्रारंभ करण्यात आले. दिंडी राजीव गांधी कला मंदिर ते वरचा बाजार फोंडा मार्गे प्रारंभ केल्यानंतर जुने बसस्थानक तिस्क फोंडा येथे दिंडीचे सभेत रूपांतर झाल्यानंतर सांगता झाली.
यावेळी बोलताना सनानत संस्थेचा राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजहंस यांनी हिंदू एकता टिकून राहिल्यास गोमंतक समाज सुरक्षित राहील. देशभरातून एकूण 25 ठिकाणी हिंदू राष्ट्र जागृती अभियानांतर्गत हिंदू एकता दिंडीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. फोंडय़ातील हिंदू संघटना आणि धर्मप्रेमी नागरिकांना दिंडीत मोठय़ा संख्येने सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध हिंदू संघटना हिंदू जनजागृती समिती, विश्व हिंदू परिषद, गायत्री परिवार, केसरी वाहिनीचे सदस्य, भजनी मंडळाचे सदस्य समावेश होता.