घाल घाल पिंगा वाऱया माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात…
दुपारच्या शांत वातावरणात सुमनताईंची अशी कोणतीही गाणी ऐकणं हा सुकून असतो. कारण त्यांची गाणी ऐकताना नेहमीच एक संसारी, प्रसन्न, सोज्ज्वळ आणि शांत गृहिणी डोळय़ांसमोर उभी राहते. तिची म्हणून एक स्वतंत्र अशी वेळ असते. दुपारची. जी वेळ कामावर जाणाऱया माणसांनी, शाळेत जाणाऱया मुलांनी पाहिलेली नसते, तशी पुढे पुढे सरकत राहणारी दुपार तिने पाहिलेली असते. त्या दुपारीत एक ठहराव असतो. भल्या पहाटेपासून संथलयीत सुरू होणारी कामं सूर्योदय झाल्यापासून जी काही द्रुतलय धरतात ती थेट बाहेर जाणाऱयांना डबे बाटल्या भरून देऊन, त्यांच्या वस्तू आयत्यावेळी शोधून देऊन ते निघेपर्यंत अक्षरशः ‘नादतराणे’ होत असतात. मग पाठचं सगळं आवरून स्वयंपाकघरात झाकपाक करून, घरातल्या वस्तू पुन्हा एकदा नीट टापटीप ठेवून ती काहीशी स्थिरावते, किंचित सैलावते. पूर्वीच्या काळात रेडिओ आणि आताच्या काळात यूटय़ूब लावते. आणि सकाळपासून एक चहाही सुखाने घ्यायला न मिळालेली ती आत्ता कुठे चहा नाश्ता करते. तोपर्यंत बहुधा अकरा वाजून गेलेले असतात. सकाळपासून उजेड वाढवत नेण्याची घाई लागलेल्या सूर्याचंही टार्गेट कंप्लीट झालेलं असल्याने तोही सुशेगाद वरवर चढत असतो. आजूबाजूला शांतता असल्याने बारीकसारीक आवाजही स्पष्ट ऐकू येत असतात. आणि सुमनताईंचा रेशीमस्पर्शी स्वर झुळझुळायला लागतो,
सहज तुला गुपित एक सांगते दुपारी
डोळियात आली गडे प्रीत माझी लाजरी
भावसंगीताच्या विश्वाला समृद्ध करणारी ही गीतं अनमोल आहेत. कदाचित ती सगळीच काही खूप प्रसिद्ध झाली असतील असंही नाही. पण गेली कित्येक वर्षे दुपारवेळीची चिमूटभर स्तब्धता, कणभर ठेहराव दिवसभर पुरवून पुरवून वाटणाऱया गृहिणींना त्या गाण्यांनी खरंच सुकून दिला आहे.
तसं पाहिलं तर दिवसभरात दुपारच्या या वेळेकडे कुणाचं लक्षही नसतं. तितका वेळच नसतो कुणाला. बाहेर जाणाऱयांची ही धामधुमीत केव्हाच निसटून जाणारी वेळ…ओपीडी पेशंटनी फुललेल्या असतात, कोर्टाची कामधामं जोरदार सुरू असतात. कॉर्पोरेट ऑफिसमध्ये बाहेरच्या उन्हाची वेळेची दखल न घेता एसीच्या एकसुरी चौकटीत तापातापी सुरू असते. सरकारी कार्यालयातही जडपायी का होईना पण कामं सुरू असतात. शाळांत मुलांच्या अभ्यास, खेळ, गडबडीला उधाण आलेलं असतं. सर्वांचं लक्ष आपापल्या कामात आणि जो तो घाईत असतो. फक्त जाग्यावर पडलेले पेशंट, थकल्यामुळे अंथरुणाला खिळून असलेली म्हातारी माणसं आणि त्या सगळय़ांचं करून पुन्हा मुलं शाळेतून घरी येण्याआधी चार क्षण शांतता मिळवण्याचा प्रयत्न करणाऱया गृहिणी यांनाच ही दुर्मिळ वेळ पकडता येते. या जोडीला उगवत्या आयुष्याचं प्रतीक असलेली खूप छोटी छोटी बाळं मात्र असतात. पण त्यांना काय समजावं? सारंग, गौडसारंग घराच्या ओसरीवर येण्याची ही वेळ…
मोहन की मुरली बाजे
बाजे बाजे मन को लुभावे
याचवेळी अतीव सुखद, जास्तच गोड का वाटतं ते या समयसूचनामुळेच बहुतेक. पं. वेंकटेश कुमारांचा तो खडीसाखरेसारखा स्वर, झपतालासारखा पिसांच्या हिंदोळय़ावर नेणारा ठेका आणि रंध्रारंध्रात पसरत जाणारं ते तरल पिसं. अगदी या क्षणी जग थांबावं आणि संपन्नतेच्या समाधीत कायमसाठी विलीन होऊन जावं, असं वाटायला लावणारी ही बंदिश. तर काहीवेळा दुपारची जेवणं आटोपल्यावर जो थोडा निवांत वेळ मिळतो. त्या वेळाशी नातं सांगणारी काही गाणी असतात. खरं तर हा वेळ मोकळा म्हणावा असा नसतोच. कधी हाताशी असणारं निवडणटिपण?, तर कधी भाज्यांची उस्तवार, तर कधी आठवडय़ाभराचं पुरवठय़ाचं सुकं खाणं करायची लगबग. दिवसभराच्या श्रमाने डोळे मिटत असतात आणि सवयीप्रमाणे हाताने कामं सुरू असतात. मंद आवाजात गाणी सुरू असतात. त्यांना खिडकीवरच्या झुळझुळत्या पडद्याची साथ असते. आणि एका हेलकाव्यासरशी पडद्याआडून उन्हाची तिरीप खोलीत उतरते. आणि त्याचवेळी आशाताईंच्या गळय़ातून शब्द रुणझुणतात.
नकळता असे ऊन मागून येते
सुखाची पुन्हा दुःख चाहूल घेते.
त्या गाण्याच्या ओळी सुंदर म्हणजे किती सुंदर म्हणाव्यात!
कितीदा हसूनी नव्याने जगावे ?
कितीदा रंग या जीवनाचे पहावे ?
जुई-मोगऱयाला जसा गंध येतो
नवा गार वारा वनी वाहताना
मनासारखी मी तुझी होत जाते
तुला सांजवेळी पुन्हा पाहताना
पुन्हा एकमेकांस आधार होता
तुला मी, मला तू, अता पांघरावे
अशोक पत्की नामक स्वरजादूगाराची किमया जबरदस्त आहे. भर दुपारच्या वेळी जंगलात शांतपणे फिरताना एवढं ऊन असूनही ते लागत नाही. डोळय़ाला झळा दिसतात पण देहाला झुळूक जास्त जवळची असते. संसारात मुरलेल्या अनुभवी जोडीमधलं नातं याहून वेगळं काय असतं? बाहेर उन्हाच्या झळा असतातच पण ती रणरण काळजापर्यंत पोहोचू न देणारा प्रेमाचा अखंड गारवा इतक्मया वर्षांत कमवलेला असतो.
तीन वाजून गेले की मग उन्हाचा संसार आवरायला सुरुवात होते. आता सूर्याला पळायची घाई झालेली असते. आता उन्हं उतरत उतरत पाठच्या दारी पोहोचलेली असतात. इकडे दुपारची बसघडीची कामं संपून पुन्हा एकदा नाच गं घुमा सुरू होतं. दुधाची पातेली गॅसवर चढते. चहाच्या पातेलीत मापात ठेवलेल्या पाण्याला आधण येतं. पाण्यात नेमक्मया प्रमाणात साखर पडते, आलंवेलचीचा ठेचका, ताजा मसाला पाण्यात पडून चहाची सुगंधी वर्दी घरभर पोहोचवतो. नशिबाने त्याच पाचसात मिनिटात चालून येणारं कुठलंही काम नाही असाही क्वचित एखादा दिवस मिळालेला असतो. मग मलईदार दुधात मस्त मुरलेला चहा मिसळतो आणि त्याचा पहिलाच घोट त्या ताज्या चवीचा उत्सव साजरा करीत असतानाच टीव्हीवर धून वाजते,
भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो
तू मला शिकविली गीते
बस्स! उन्हाने यमनची वेळ सुरू झाल्याचं कळवलेलं असतं. आता आपलं एकांडं राज्य संपलं हे उन्हालाही कळून चुकतं आणि गृहिणीलाही. आता पुन्हा एकदा घरी येणाऱयांची वाट बघत संध्याकाळची तयारी सुरू होते. बघता बघता सावल्या वाढत जातात. सूर्य निघून जातो. घरटय़ातलं सगळं आवरून अंथरुणाला पाठ टेकण्याआधी ‘ती’ सहज म्हणून पाच मिनिटे टेकायला गॅलरीत किंवा पडवीत जाते. उन्हाने ठेवलेल्या अस्तित्त्वाच्या उबदार खुणा तिच्या पावलांना अजूनही सुकून देतात. ती नांदी असते… उद्याच्या भेटीची. तिच्या स्वतःच्या ‘मी टाईमची’! सकाळी नि संध्याकाळी असतो तो नुसताच उजेड..पण उन्हाचं तसं नसतं. त्याला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतं. कधी उबदार तर कधी मऊशार, कधी रणरणतं तर कधी उतरतं. आणि हे सगळे मूड्स तिलाच माहीत असतात. हो… उन्हाची सोबत तिच्याइतकी कुणाला कळणार ना?
-ऍड. अपर्णा परांजपे-प्रभू