मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा विश्वास : आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे गोव्यात उद्घाटन
प्रतिनिधी / पणजी
गोव्यासारख्या छोटय़ा राज्यात ऊसांचे पिक अन्य राज्यांच्या मानाने अत्यल्प म्हणावे असेच आहे. त्याशिवाय एकमेव असलेला साखर संजीवनी कारखानाही गेल्या काही वर्षांपासून बंद आहे. असे एकुण चित्र असतानाही साखरेसंबंधीची आंतरराष्ट्रीय परिषद गोव्यात आयोजित करण्यात येते हे खरोखरच कौतुकास्पद असून त्यातून प्रेरणा घेऊन आम्ही राखर उत्पादनासाठी नव्या दमाने पावले मारणार आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. भविष्यात साखर उद्योगाला हमखास ’अच्छे दिन’ येतील व भारत आत्मनिर्भर बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
80 व्या वार्षिक आंतरराष्ट्रीय साखर परिषद तथा दोन दिवशीय प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. बांबोळी येथील शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आयोजित या सोहळ्यास व्यासपीठावर त्यांच्यासमवेत केंद्रीय ग्राहक व्यवहार तथा ग्रामीण विकास मंत्री साध्वी निरंजन ज्योती, अन्न आणि सार्वजनिक वितरण खात्याचे सचिव सुधांशू पांडे, सरस्वती शुगर मिल्स चे अध्यक्ष रणजित पूरी, भारतीय साखर विकास संघटनेचे अध्यक्ष संजय अवस्थी, एनएसईआयचे संचालक नरेंद्र मोहन, व्हिएसआयचे महासंचालक शिवाजीराव देशमूख, एसएसआयटीचे पांडे कुमार आणि एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर आदींची उपस्थिती होती.
गोव्याची खरी ओळख पर्यटक राज्य म्हणून आहे. येथील समुद्र किनारे, मंदिरे, चर्च, यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती आहे. त्यामुळे या परिषदेच्या निमित्ताने गोव्यात दाखल झालेल्या सर्वांनी या सौंदर्याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. गोव्यातील जैवविविधताही जगप्रसिद्ध आहे. गोव्याच्या शेजारील दोन्ही राज्यात मोठय़ा प्रमाणात ऊसाचे पिक घेण्यात येते. त्यामानाने गोवा खूपच मागे आहे. तरीही ही परिषद गोव्यात होते याचा आम्हाला अभिमान आहे.
आजच्या या परिषदेसाठी ऊस शेतकरी उपस्थित तर आहेतच त्याशिवाय साखर उत्पादना आणि संशोधनाशी संबंधित टेक्नॉक्रेटस्, अभियंते, तसेच या क्षेत्रातील अद्वितीय कार्यासाठी पुरस्कार प्राप्त देशविदेशातील मान्यवर यांचाही सहभाग आहे, त्या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.
एकेकाळी आम्ही साखरेची आयात करत होतो. आज आम्ही निर्यातदार बनलो आहोत. यात या क्षेत्राशी संबंधित सर्वांचे योगदान प्रशंसनीय आहे. इथनॉल उत्पादनात साखर उद्योगाचा 10 टक्के वाटा आहे. त्यावरून रिनिवेबल उर्जा उत्पादनाशी साखर उद्योगाचा संबंध आहे. भविष्यात इथनॉल उत्पादन वाढविण्यात या उद्योगाने अधिक योगदान दिल्यास तेल आयातीचे प्रमाण कमी हाऊन या क्षेत्रातही स्वयंपूर्ण होण्यात मदत होईल. आज या क्षेत्रात जे संशोधन सुरू आहे त्यावरून तरी तेल आयात कमी होण्यात साखर उद्योग महत्वाची भूमिका निभावेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
व्यासपीठावरील अन्य मान्यवरांचीही भाषणे झाली. विविध पुरस्कार विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.