कोलंबो / वृत्तसंस्था
श्रीलंकेत भडकलेली महागाई आणि तेथील सरकारच्या आर्थिक धोरणाविरोधात जनक्षोभ उसळल्याने देशातून पलायन केलेले माजी अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे पुन्हा स्वदेशात परतण्याच्या तयारीत आहेत, असे दिसत आहे. ते 24 ऑगस्टला पुन्हा श्रीलंकेत येतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
श्रीलंकेच्या एका प्रसिद्ध वृत्तपत्राने विश्वसनीय माहितीच्या आधारे हे वृत्त प्रसारित केले असून या माहितीला गोटाबाया राजपक्षे यांचे चुलत बंधू वीरतुंगा यांनी दुजोरा दिला. गोटाबाया राजपक्षे राजीनामा देऊन प्रथम सिंगापूर येथे पळून गेले होते. त्यांनी फोन करुन आपण श्रीलंकेला पुढील आठडय़ात परतत आहोत, असे स्पष्ट केल्याचे वीरतुंगा यांचे म्हणणे असल्याचा दावा या वृत्तपत्राने केला आहे. मात्र, त्या देशाच्या सरकारने अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. तसेच श्रीलंकेतील जनता गोटाबाया राजपक्षे यांचे स्वागत कशा प्रकारे करेल हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यांच्या पुनरागमनाकडे इतर देशांचेही लक्ष आहे.