वृत्तसंस्था / नवी दिल्ली
3 जुलैपासून 17 सप्टेंबरपर्यंत 75 दिवसांसाठी 75 समुद्र किनाऱयांवर सफाई मोहीम चालविली जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी नवी दिल्ली येथील पृथ्वी भवनात ‘आंतरराष्ट्रीय किनारी सफाई दिवस 2022’च्या तयारीच्या आढावा बैठकीदरम्यान दिली आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या तिसऱया शनिवारी हा दिन साजरा करण्यात येतो. यंदा 17 सप्टेंबर रोजी हा दिन साजरा होणार असून योगायोगाने त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जन्मदिनी देखील आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त देशभरात ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा होत असल्याने हा दिवस विशेष ठरत असल्याचे जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.
अशाप्रकारची पहिलीच आणि सर्वात दीर्घकाळ चालणारी ही किनारी सफाई मोहीम असणार असून यात मोठय़ा संख्येत लोक भाग घेणार आहेत. किनारी क्षेत्रच नव्हे तर देशाच्या अन्य हिस्स्यांच्या समृद्धीसाठी ‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर’चा संदेश देण्यासाठी ही मोहीम असून यात सर्वसामान्य लोकांची भागीदारी आवश्यक असल्याचे केंद्रीय मंत्री म्हणाले.
आंतरराष्ट्रीय किनारी सफाई दिवसानिमित्त किनारी क्षेत्रांसह बिगरकिनारी क्षेत्रांनाही सफाई मोहिमेत सामील केले जावे, याकरता लोकांमध्ये संदेश प्रसारित करण्याची योजना आखली जावी आणि यात देशातील महाविद्यालये, विद्यापीठे आणि अन्य संस्थांची महत्त्वाची भूमिका असावी असे केंद्रीय मंत्र्यांनी बैठकीत सुचविले आहे.
बैठकीत केंद्रीय मंत्र्यांनी टॅगलाइन आणि याच्याशी निगडित अन्य पैलूंवरही समीक्षा केली. 75 दिवसांपर्यंत चालणारी ही मोहीम 3 जुलै रोजी पत्रकार परिषदेसह सुरू होणार आहे. त्यावेळी देशातील अनेक महनीय व्यक्ती मोहिमेत सामील होणार आहेत. मोहिमेचे लक्ष्य सागरकिनाऱयांवरून 1,500 टन कचरा हटविणे आहे. हा कचरा हटविण्यात आल्यास किनारी क्षेत्रांमध्ये राहणाऱया लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या बैठकीत तटरक्षक दलाचे महासंचालक, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि अन्य संघटनांचे प्रतिनिधी सामील झाले होते.