जम्मूने जल्लोषाची तयारी करावी ः भाजप प्रदेशाध्यक्ष
@ वृत्तसंस्था / जम्मू
जम्मू-काश्मीरच्या राजकारणात आता ‘महाराजां’ची एंट्री झाली आहे. अखेरचे डोगरा शासक महाराज हरि सिंह यांच्या जन्मदिनी शासकीय सुटी घोषित करविण्याची तयारी भाजपने चालविली आहे. स्वतंत्र भारतात एखाद्या राजाच्या जन्मदिनी शासकीय सुटी घोषित होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असणार आहे.
जम्मू-काश्मीरमधील राजपूत समुदायाने यासंबंधीच्या मागणीवरून आंदोलनाचा इशारा दिला होता. याचमुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी जम्मूमधील नागरी समुदाय अन् व्यापारी संघटनांसोबत बैठका घेतल्या होत्या. भाजपने विलय दिनी (26 ऑक्टोबर) शासकीय सुटी घोषित करायला लावली. महाराजांच्या जन्मदिनी (23 सप्टेंबर) सुटीची अधिसूचना लवकर जारी व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. उपराज्यपालांनी आम्हाला आश्वासन दिले आहे. जम्मूने जल्लोष साजरा करण्याची तयारी करावी असे उद्गार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र रैना यांनी काढले आहेत.
काश्मीरमध्ये महाराजांच्या विरोधात बंड करणाऱयांच्या स्मरणार्थ शहीदी दिवस साजरा केला जातो तसेच सुटीची देखील घोषणा होत राहिली आहे. पीडीपी अन् भाजपचे आघाडी सरकार असताना पीडीपीने महाराजांच्या जयंतीनिमित्त सुटी घोषित करण्यास विरोध दशविला होता असे रविंद्र रैना यांनी म्हटले आहे.
महाराजा हरि सिंह यांना 1949 मध्ये शेख अब्दुल्ला यांच्यासोबतच्या मतभेदांमुळे राज्यातून बाहेर पडावे लागले होते. हरि सिंह यांचे 1961 मध्ये वयाच्या 66 व्या वर्षी मुंबईत निधन झाले होते. जम्मूमध्ये महाराजा हरि सिंह यांचा एकही पुतळा नव्हता. एप्रिल 2012मध्ये डॉ. कर्ण सिंह आणि त्यांचे पुत्र अजातशत्रू सिंह तसेच गुलाम नबी आझाद यांनी हरि सिंह यांच्या पुतळय़ाचे अनावरण केले होते.
राजपूतांचे लक्षणीय प्रमाण
भाजपने पीडीपीसोबत आघाडी सरकार असताना हरि सिंह यांच्या जयंतीला सुटी घोषित करविण्याचा प्रयत्न 2017 मध्ये केला होता. परंतु या मागणीला विरोध झाल्याने अंतिम निर्णय होऊ शकला नव्हता. राजपूत समाजाने आता या मागणीवरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 28.33 टक्के हिंदू तर 68.34 टक्के मुस्लीम लोकसंख्या आहे. हिंदूंमध्ये 27 टक्के प्रमाण राजपूत समुदायाचे आहे.