केंद्रीय मंत्री सोमप्रकाश यांनी साधला लाभार्थींशी संवाद : भारत जगात वेगाने विकसित होणारा देश
प्रतिनिधी /बेळगाव
केंद्र सरकारने गेल्या आठ वर्षांत गरीब व शेतकऱयांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. या योजनांचा मूळ उद्देशच गोर-गरिबांचे कल्याण करणे हा आहे. या काळात आपला देश संपूर्ण जगात वेगाने विकसित होणारा देश म्हणून ओळखला जावू लागला आहे, असे केंद्रीय मंत्री सोमप्रकाश यांनी सांगितले.
सोमवारी सुवर्ण विधानसौधमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आठ वर्षे पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या लाभार्थींशी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. 2014 पूर्वीची परिस्थिती आता नाही. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवी आशा निर्माण झाली आहे. गोर-गरिबांच्या कल्याणासाठी उत्तम प्रशासन दिले जात आहे. भारत विश्वगुरु होण्याचा संकल्प करण्यात आला आहे, असेही सोमप्रकाश यांनी सांगितले.
60 लाख लाभार्थींना लाभ
पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी प्रास्ताविक केले. शेतकरी व गोर-गरिबांच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना राबविल्या आहेत. प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेंतर्गत दरवषी शेतकऱयांना केंद्र सरकारकडून 6 हजार रुपये व राज्य सरकारकडून 4 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यातच जमा केले जात आहेत. वृद्ध, विधवा, गरीब आदी 60 लाखांहून अधिक लाभार्थींना या योजनांचा लाभ झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील 75 ठिकाणी केंद्रीय मंत्री लाभार्थींशी थेट संवाद साधत आहेत. कर्नाटकातील बेंगळूर व बेळगाव या दोनच शहरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विविध योजनांच्या लाभार्थींनी या संवाद कार्यक्रमात भाग घेऊन आपले म्हणणे मांडले.
यावेळी धर्मादाय, हज व वक्फ खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले, खासदार मंगला अंगडी, आदीजांबव विकास निगमचे अध्यक्ष दुर्योधन ऐहोळे, अल्पसंख्याक विकास निगमचे अध्यक्ष मुक्तार हुसेन पठाण, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., केंद्रीयमंत्र्यांचे स्वीय साहाय्यक बसंत गर्ग आदींसह लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.