केंद्रीय सचिव पांडे यांच्या बैठकीमध्ये अंदाज झाला व्यक्त
नवी दिल्ली
सरकारने चालू खरीप हंगामासाठी केंद्रीय पूलमध्ये 5.18 कोटी टन तांदूळ खरेदी करणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.60 टक्क्यांनी जास्तीचा राहणार असल्याचाही दावा केला आहे. अशी माहिती केंद्रीय खाद्य सचिव सुधांशू पांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देण्यात आली आहे.
सदरच्या बैठकीमध्ये तांदूळ खरेदी करण्यासंदर्भात सरकारने आपला अंदाज निश्चित केला आहे, यावेळी या बैठकीत राज्यांच्या खाद्य सचिवांव्यतिरिक्त भारतीय खाद्य महामंडळाचे (एफसीआय) वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
यावर्षी कमी पावसामुळे भातशेतीचे एकरी उत्पादन कमी झाल्यामुळे सरकारी साठय़ातील भातखरेदीचा हा अंदाज महत्त्वाचा ठरतो. एका अनुमानानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाताचे क्षेत्र सुमारे सहा टक्के कमी आहे. त्यामुळे भात उत्पादनात घट होण्याची शक्यता तज्ञ व्यक्त करत आहेत.
भरड धान्य खदेरीवर विशेष लक्ष
या बैठकीत अन्न सचिवांनी राज्य सरकारांना भरड धान्य खरेदीवर विशेष लक्ष देण्यास सांगितले. ते म्हणाले की, वातावरणातील बदलामुळे गहू व तांदळाच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होत असल्याने भरड धान्याची काळजी घेण्याची गरज आहे. अन्नपुरवठय़ात खंड पडू दिला जाणार नाही.