मागासवर्गीय कुटुंबांना वितरण करण्याकडे दुर्लक्ष : नागरिकांतून संताप : कुपोषित मुलांना पौष्टिक अंडी पुरविण्याचा होता उद्देश
प्रतिनिधी /बेळगाव
सध्या देशभरात कुपोषण मुक्तीचे अभियान सुरू आहे. कर्नाटकानेही या प्रकारचे प्रयत्न मोठय़ा प्रमाणात सुरू केले आहेत. कुपोषण दूर करून मुलांना सदृढ बनविण्याचा वसा घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा प्रशासनाने अंगणवाडीत शिकणाऱया मागासवर्गीय मुलांच्या पालकांना गिरीराज कोंबडी वितरित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, याला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. या कोंबडय़ा आकाराने मोठय़ा व पौष्टिक अंडी देतात असे सांगत अंडय़ांचा वापर करून कुपोषित मुलांचे आरोग्य सुधारण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे सांगण्यात आले होते. मात्र तसे झाले नाही.
महिला आणि बालकल्याण खात्याच्या माध्यमातून आजवर कुपोषणातून मुक्तता मिळविण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले. मात्र, या प्रयत्नांना यश आले नाही. जास्तीत जास्त कुपोषित मुले अनुसूचित जाती व जमातीमधील कुटुंबांमधून आढळल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. यामुळेच सरकारने पशुसंगोपन, महिला आणि बालकल्याण खात्याच्या अधिकाऱयांना याबद्दल सूचना दिल्या होत्या. मात्र केवळ कागदी घोडे नाचवून ही योजना बंद करण्यात आली आहे. पशुभाग्य योजनेंतर्गत अशा कुटुंबांना गिरीराज कोंबडी वितरीत करण्याचा आदेश दिला होता. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
कोंबडय़ा वाटपाकडे दुर्लक्ष
अनुसूचित जाती व जमातीतील कुटुंबांसाठी सरकारच्या विविध योजना आहेत. या योजनांतर्गत अशा कुटुंबांचा आर्थिक स्तर वाढविण्याच्यादृष्टीने ग्रामीण भागातील मागावर्गीय कुटुंबांना गिरीराज कोंबडी देण्याची योजना आखण्यात आली होती. आता आर्थिक स्तराबरोबरच अशा कुटुंबातील कुपोषित मुलांच्या आरोग्याचा स्तरही उंचावण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार होते. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नसल्याचे दिसून येत आहे. जर या कोंबडय़ा वेळेवर वितरीत झाल्या असत्या तर यामुळे अनेक कुटुंबांना याचा फायदा होणार होता. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पशुसंगोपन खात्याच्या उपसंचालकांनी सांगितल्याप्रमाणे कोंबडय़ांचे वितरण्यात आले होते. मात्र, त्यानंतर धारवाड जिह्यातील एका केंद्रातून कोंबडय़ांसाठी मागणी केली होती. मात्र, त्या उपलब्ध करून देण्याकडे सरकारने कानाडोळा केला. प्रत्येक कुटुंबाला दोन कोंबडय़ा वितरित केल्या जाणार होत्या. पण, कोंबडय़ा दिल्याच नाहीत. त्यामुळे अशा योजनांचा गाजावाजा करण्यापेक्षा प्रत्यक्षात कृती करणे सोयीस्कर ठरते.
जिल्हय़ात 1 हजारांहून अधिक कुपोषित मुले
अंगणवाडीमध्ये शिकणाऱया मुलांचा आरोग्यविषयक अहवाल मागविला असता, संपूर्ण जिह्यामध्ये 1 हजारांहून अधिक कुपोषित मुले आढळून आली आहेत. यापैकी जास्तीत जास्त मुले अनुसूचित जाती-जमाती या मागास गटातील कुटुंबांमध्ये आढळली आहेत. यामुळे याच कुटुंबांना सर्वप्रथम कोंबडय़ा पुरविल्या जाणार होत्या. आर्थिक स्तर वाढविण्याच्या दृष्टीने ही कुटुंबे भविष्यात कोंबडय़ांची संख्या वाढवूही शकतात, असे सांगण्यात आले होते. मात्र, कोंबडय़ाच देण्यात आल्या नाहीत तर संख्या कशी वाढणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
गिरीराज कोंबडीचे फायदे
- गिरीराज कोंबडीची जात कर्नाटक पशुसंगोपन, पशुवैद्यकीय आणि मत्स्यशास्त्र विद्यापीठ बेंगळूरने अथक संशोधनांती तयार केली आहे.
- हायब्रिड प्रकारची ही कोंबडी इतर जातीच्या कोंबडय़ांपेक्षा जलद वाढते, शिवाय अंडी देण्याचे प्रमाणही इतर कोंबडय़ांपेक्षा जास्त आहे.
- गिरीराज कोंबडी वर्षाला 130 ते 150 अंडी देऊ शकते.
- प्रत्येक अंडीचे वजन 52 ते 55 ग्रॅम असते.
- अंडी पौष्टिक असल्याने त्याचे सेवन केल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
- या कोंबडीच्या संगोपनासाठी विशेष काळजी घ्यावी लागत नाही.