वनखाते-महसूल खात्याकडून कागदपत्रांच्या पूर्ततेची जांबोटी-कणकुंबी भागातील धाबाचालकांना नोटीस : अन्यथा व्यवसाय बंदचा इशारा
प्रतिनिधी /खानापूर
तालुक्यातील जांबोटी-कणकुंबी भागातील बेळगाव, गोवा रस्त्याशेजारी असलेल्या धाब्यावर (हॉटेल) कन्नड सरकारची वक्रदृष्टी पडली असून, या ग्रामीण भागातील व्यावसायिकांना व्यवसाय बंद करण्यासंदर्भात नोटिसा देण्यात आल्या आहेत. या नोटिसा वनखाते तसेच महसूल खात्याकडून धाबाचालकांना देण्यात आल्या आहेत. तसेच वेगवेगळ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात यावी, अन्यथा आपला व्यवसाय बंद करण्यात यावा, असे नोटिसीत म्हटले आहे. त्यामुळे बेळगाव-गोवा रस्त्यावर असलेल्या धाबाचालकांचे धाबे दणाणले आहेत.
बेळगाव-गोवा रस्त्यावर चोर्लामार्गे वाहतूक वाढल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या स्वत:च्या जागेत हॉटेल किवा धाबा घालून व्यवसाय सुरू केला होता. गेल्या चार-पाच वर्षापासून या ठिकाणी व्यवसाय चांगला सुरू होता. नुकतेच एका कन्नड वृत्तपत्रात या व्यावसायिकाबांबत वृत्त छापून आल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून कणकुंबी विभागाचे वनाधिकारी म्हणून या भागातील धाबा व हॉटेल चालकांना नोटिसा दिल्या आहेत. तसेच वेगवेगळ्या खात्यांच्या परवानग्या तसेच जागेचे बिगर शेती केलेले प्रमाणपत्र यासह अन्य प्रमाणपत्रांची मागणी केली आहे. अन्यथा आपला व्यवसाय बंद करावा, अशा आशयाची नोटीस दिली आहे. महसूल विभागाकडून या धाबाचालकांनाही नोटीस दिली असून परवानगी घेतलेल्या कागदपत्रांची माहिती महसूल खात्याला द्यावी. तसेच महसूल विभाग, ग्राम पंचायत, वनखात्याकडून परवानगी घ्यावी, अशी नोटीस दिली आहे.
अवैध खनिज उत्खननाकडे सोयीस्कर दुर्लक्ष
धाबा व हॉटेलचालकांनी रस्त्यालगत असलेल्या आपल्या जागेत व्यवसाय सुरू केल्यावर वन व महसूल खाते नियमांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात नोटिसा बजावत आहेत. मात्र याच भागात अवैध उत्खनन करून कोट्यावधीचे खनिजाची या ठिकाणाहून राजरोसपणे वाहतूक केली. त्यावेळी वन, महसूल, भूगर्भ खात्याने मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष केले होते. ‘तरुण भारत’ने याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर महसूल व भूगर्भ खात्याने येथील उत्खनन गेल्या सहा महिन्यापासून थांबविले आहे. मात्र हे खनिज व्यावसायिक पुन्हा दबाव तंत्राचा वापर करून या राखीव जंगलातून तसेच इकोसेन्सेटिव्ह झोनमध्ये बेकायदेशीर उत्खनन करून खनिज वाहतुकीच्या प्रयत्नात आहेत.
धाबा व्यवसायामुळे ग्रामीण भागातील युवकांना स्वत:चा व्यवसाय सुरू केल्यामुळे आर्थिक सुबत्ता येत होती. परंतु शासनाकडून हा व्यवसाय कसा बंद करता येईल तसेच मराठी भाषिकांची कशी गळचेपी करता येईल, हाच या मागचा उद्देश असल्याचे दिसते.
धाबाचालकांकडून वनखात्याच्या मार्गसूचीचे उल्लंघन
वनखात्याच्या कणकुंबी विभागातील वनाधिकारी गणेश शेट्टर यांना विचारले असता, धाबाचालकांनी वनखात्याच्या मार्गसुचीचे उल्लंघन केले आहे. तसेच वन्यजीव संरक्षण मंडळाच्या झालेल्या बैठकीत व्याघ्रप्रकल्प आणि वन्यजीव कॅरीडोरच्या भागात कोणताही व्यवसाय करता येत नाही. असे असताना या भागात धाबा व हॉटेल सुरू केले आहे. ते नियमबाह्या आहे. यासाठी शासनाच्या नियमानुसार त्यांनी परवानगी घेणे गरजेचे आहे, असे ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले. तर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत सरकारच्या आदेशानुसारच या नोटिसी धाडण्यात आलेल्या आहेत, असे सांगितले.