424 व्हीव्हीआयपींना पुन्हा मिळणार सुरक्षा : सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर सुचले शहाणपण
वृत्तसंस्था/ चंदीगड
पंजाबमध्ये गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर टीकेचे धनी बनलेल्या भगवंत मान सरकारने व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेवरून यु-टर्न घेतला आहे. बॅकफूटवर आलेल्या आम आदमी पक्षाच्या सरकारने 424 व्हीव्हीआयपींना पुन्हा सुरक्षा पुरविली आहे. सुरक्षा मागे घेण्याच्या निर्णयावरून पंजाब तसेच हरियाणा उच्च न्यायालयाने आप सरकारला गुरुवारी फटकारले आहे. ही सुरक्षा तात्पुरत्या स्वरुपात मागे घेण्यात आली होती आणि ती 7 जून रोजी पुन्हा प्रदान करण्यात येईल, अशी भूमिका राज्य सरकारने मांडली होती.
पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारने यापूर्वी शनिवारी 424 जणांच्या सुरक्षेत कपात केली होती. या निर्णयानंतर सुरक्षेतील कपातीचा निर्णय जाहीर केल्याप्रकरणी मान सरकारवर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली होती. या निर्णयाच्या दुसऱयाच दिवशी पंजाबी गायक सिद्धू मूसेवालावर त्याच्याच गावात गोळीबार करत त्याची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर आप सरकारने स्वतःच्या चुकीतून धडा घेत सुरक्षा पुरविण्यासंबंधी अत्यंत सतर्कता बाळगली आहे. व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेसंबंधी नवा अहवाल सरकारने पोलीस विभागाकडून मागविला आहे.
व्हीव्हीआयपींच्या सुरक्षा व्यवस्थेची दर महिन्याला समीक्षा करण्याचा निर्णय भगवंत मान सरकारने घेतला आहे. जीवाला धोका असल्याचे सांगत सुरक्षेची मागणी करणाऱया सर्व व्हीव्हीआयपींना तत्काळ सुरक्षा पुरविण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. सुरक्षेच्या आवश्यकतेसंबंधी छाननी काही काळानंतर केली जाणार आहे. ज्या व्हीव्हीआयपींना सुरक्षा पुरविण्यात आली आहे, यातील बहुतेक जणांनी गँगस्टर्सकडून जीवाला धोका असल्याचे सांगितले होते.
धर्मगुरुंना पुरविली सुरक्षा
राज्य सरकारने विविध धर्मगुरुंना पुन्हा सुरक्षा पुरविली आहे. तसेच त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचाही आदेश दिला आहे. धर्मगुरुंना पूर्वी प्राप्त सुरक्षा व्यवस्थेत आता अतिरिक्त वाहन आणि सुरक्षा कर्मचारी जोडले जाणार आहेत. तर व्हीव्हीआयपींची सुरक्षा कमी करण्याची शिफारस करणाऱया अहवालावरून राज्य सरकारने संबंधित अधिकाऱयांना उत्तरदायी ठरविण्याचा निर्णय घेतला आहे. कुठल्या आधारावर व्हीव्हीआयपींची सुरक्षा कमी करण्याची शिफारस केली गेली? अशी विचारणा सरकारने संबंधित अधिकाऱयांना केली आहे. पंजाबी गायक मूसेवाला याच्या जीवाला धोका असल्याचा इनपूट पोलिसांना मिळाला होता, तरीही त्याची सुरक्षा कमी करण्यात आली होती.