ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनविण्यात गुजराती आणि राजस्थानी लोकांचे योगदान उल्लेखनीय आहे. या लोकांना मुंबईतून काढून टाकले तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाहीत. मुंबईची आर्थिक राजधानी ही ओळखही पुसली जाईल, असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केले होते. या वक्तव्यामुळे राज्यपाल कोश्यारी सध्या टीकेचे धनी ठरत आहेत. भाजप वगळता सर्वपक्षांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. दरम्यान, या प्रकरणावर आता कोश्यारी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
कोश्यारी यांच्याकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्यामुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला.
राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही.
नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल. एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो. कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये. किमान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही. विविध जाती, समुदाय यांनी नटलेल्या या मराठी भूमीच्या प्रगतीत, विकासात सर्वांचेच योगदान आहे आणि त्यातही मराठी माणसाचे योगदान अधिक आहे, असे कोश्यारी यांनी नमूद केले आहे.
हेही वाचा : राज ठाकरेंनी काढली ‘कोश्यारींची होशियारी’, म्हणाले…