मेघालयाची अतिरिक्त जबाबदारी ः मलिक यांना वाढीव कार्यकाळ नाही
वृत्तसंस्था/ शिलाँग
अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल बी.डी. मिश्रा यांना मेघालयचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला आहे. मेघालयाचे वर्तमान राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा कार्यकाळ 3 ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज संपुष्टात येणार आहे. राष्ट्रपती भवनाने मिश्रा यांना अतिरिक्त प्रभार देण्यात आल्याची माहिती एका पत्रकाद्वारे दिली आहे.
रद्दबातल ठरलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात मलिक हे केंद्र सरकारवर टीका करत हेते. मलिक हे ऑगस्ट 2020 मध्ये मेघालयाचे राज्यपाल नियुक्त झाले होते. त्यापूर्वी त्यांनी बिहार, जम्मू-काश्मीर आणि गोव्याचे राज्यपाल म्हणून काम पाहिले हेते.
अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ब्रिगेडियर (सेवानिवृत्त) बी.डी. मिश्रा हे तात्पुरत्या स्वरुपात मेघालयचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त प्रभार सांभाळणार असल्याचे राष्ट्रपती भवनाकडून सांगण्यात आले आहे. कलम 370 रद्द करण्यापूर्वी मलिक हे जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. त्यानंतर राज्याला दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागण्यात आले होते. 2017 मध्ये त्यांना बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले होते. जम्मू-काश्मीरनंतर मलिक यांच्याकडे गोवा आणि अखेरीस मेघालयचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती.
शेतकरी आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या विरोधात जाहीरपणे टीकाटिप्पणी केल्याने मलिक हे वादात सापडले होते. तसेच त्यांनी केंद्र सरकारवर अनेक आरोपही केले हेते. उत्तरप्रदेशच्या बागपतचे रहिवासी असणारे मलिक हे राज्यसभा खासदारही राहिले आहेत. राज्यपाल म्हणून कार्यकाळ संपल्यावर आपण कुठल्याही राजकीय पक्षात सामील होणार नाही, परंतु शेतकऱयांसाठी काम करत राहणार असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.