प्रतिनिधी/मुंबई
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शुधांशू त्रिवेदी (sudhanshu trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. याच कारणामुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, ”महाराष्ट्राचे पाणी साधे नाही. आम्ही राज्यपाल कोश्यारी यांना पाणी पाजल्याशिवाय गप्प बसणार नाही,” असा इशारा अंबादास दानवे (ambadas danve) यांनी दिला.
अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी हा इशारा दिला आहे. यावेळी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत “शिवसेना राज्यभरात आंदोलन करत आहे. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह विधान केले आहे. शिवाजी महाराज आज तसेच येणाऱ्या काळातही सर्वांचेच आदर्श असतील. ते फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाचे आदर्श आहेत. कोश्यारी महाराष्ट्रातील महापुरूषांविषयी विधाने करत आहेत. कोश्यारी दिल्लीतील बादशहाच्या इशाऱ्यावर अशी वक्तव्ये करतात का? ते महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र या महाराष्ट्राचे पाणी साधे नाही. कोश्यारी यांना पाणी पाजल्याशिवाय शिवसेना स्वस्त बसणार नाही,” असा थेट इशारा अंबादास दानवे यांनी दिला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी शिवसेनाला कोणीही शिकवण्याची गरज नाही. आम्ही लाखो सह्यांचे निवेदन याधीच राष्ट्रपतींना दिलेले आहे. त्या निवेदनात आम्ही सावरकरांना भारतत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काही लोक गळा काढत होते. मात्र काल छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर ते रस्त्यावर उतरले नाहीत. म्हणजेच त्यांचे हिंदुत्व हे बेगडी आहे, अशी टीका दानवे यांनी केली. सावरकरांविषयी ते रस्त्यावर उतरतात. मात्र छत्रपतींविरोधात वक्तव्य केल्यानंतर रस्त्यावर उतरताना त्यांची दातखिळी बसते. महाराष्ट्र महापुरुषांची जननी आहे. देशभक्त, स्वातंत्र्यवीरांची जननी आहे. तरीदेखील महाराष्ट्राची प्रतिमा मलीन केली जात आहे, अशी टीका दानवे यांनी केली आहे.