पानसरे खून प्रकरणातील तावडे, कळसकर, अंदुरे व गायकवाड या चार संशयितांना सुनावणीसाठी बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येत असताना
कोल्हापूर – ज्येष्ठ विचारवंत गोवेंद पानसरे खून प्रकरणाची सुनावणी ५ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणातील सर्व नऊ संशयितांना न्यायालयासमोर प्रत्यक्ष हजर करण्यात येणार आहे. त्यानंतरच दोषारोप निश्चिती होणार आहे.
ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांचा १६ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी गोळया झाडून खून करण्यात आला. राजारामपुरी पोलीस ठाण्यात या खूनाचा गुन्हा नोंद होऊन तपास सुरु आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस. तांबे यांच्यासमोर याप्रकरणाची सुनावणी सुरु आहे. मागील सुनावणीवेळी न्यायालयाने अटक असलेल्या सर्व संशयितांना हजर करण्याचे आदेश दिले होते. यामुळे बुधवारी वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरे,शरद कळसकर,समीर गायकवाड यांना हजर करण्यात आले. मात्र बेंगलोर येथील सहा संशयितांना आदेशाची प्रत वेळेत न मिळाल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले नाही. यावेळी सरकार पक्षातर्फे ऍड शिवाजीराव राणे यांनी हजर न नसलेल्या संशयितांची व्हिडीओ कॉन्फरिन्सद्वारे सुनावणी घेण्याची मागणी केली. मात्र संशयितांचे वकील ऍड समीर पटवर्धन यांनी सर्व संशयित प्रत्यक्ष हजर असल्याशिवाय दोषारोप निश्चिती करु नये अशी मागणी केली. न्यायमूर्ती तांबे यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून पुढील सुनावणी ५ ऑगस्ट २०२२ रोजी घेण्याचे जाहीर केले. यामुळे आता पुढील सुनावणी ५ ऑगस्ट होऊन त्यानंतरच दोषारोप निश्चती करण्यात येणार आहे.