मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची नाणूस किल्ल्यावर घोषणा, इतिहास संवर्धन समितीच्या लढ्याला मोठे यश
वाळपई : गेल्या 14 वर्षांपासून सत्तरीतील नाणुस किल्ल्याच्या संवर्धनासाठी आणि क्रांतिवीर दिपाजी राणे यांचा इतिहास समोर यावा म्हणून सत्तरी इतिहास संवर्धन समितीतर्फे लढा सुरू आहे. याला मोठे यश प्राप्त झाले आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी सत्तरीतील ऐतिहासिक नाणुस किल्ल्यावर होणाऱ्या क्रांतीदिन कार्यक्रमात क्रांतिवीर दिपाजी राणेंना सरकारी मानवंदना देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नाणुस किल्ल्यावरून केली.
गोव्याच्या स्वातंत्र्याच्या हीरक महोत्सवानिमित्त क्रांतिवीर दीपाजी राणेंना मानवंदना देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सत्तरी इतिहास संवर्धन समितीचे सन्मवयक अॅड. शिवाजी देसाई, क्रांतीवीर दिपाजी राणे यांचे पणतू दीपाजी राणे, पोलीस महासंचालक जसपाल सिंग, आयए एस अधिकारी संजित रॉड्रिग्स, उपजिल्हाधिकारी प्रवीण परब, संयुक्त मामलेदार अपूर्वा कर्पे, गटविकास अधिकारी सुर्याजीराव राणे, माजी उपसभापती नरहरी हळदणकर, वाळपई नगराध्यक्ष सेहजीन शेख, उपनगराध्यक्ष अनिल काटकर, रामदास शिरोडकर, प्रसन्ना गावस, शराफत खान, इद्रुस शेख तसेच इतर नगरसेवक, भिरोंडा सरपंच उदयसिंग राणे, वासुदेव परब तसेच इतर पंचायतीचे सरपंच, पंच सदस्य, पोलिस खात्यासह इतर खात्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
नाणुस किल्ल्याचे संवर्धन व संरक्षण करण्याचा संकल्प सरकारने हातात घेतला आहे. सरकारचे सार्वजनिक बांधकाम खाते तसेच पुरातत्व खाते यासाठी कामाला लागले आहेत. जर नाणुस किल्ल्याच्या संवर्धनासाठी जमीन संपादन करण्यासाठी किल्ल्याच्या बाजूकडील जमीन किंवा दानपत्र करून मिळाल्यास सरकारतर्फे नाणूस किल्ल्याला पूर्वस्वरूप प्राप्त करून दिले जाणार आहे. नाणूस किल्ल्याच्या संवर्धनाची चळवळ सातत्याने पुढे नेण्यासाठी आणि सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी सत्तरी इतिहास संवर्धन समितीचे समन्वयक अॅड शिवाजी देसाई आणि त्यांची संपूर्ण टीमने केलेले कार्य कौतुकास पात्र आहे. क्रांतिवीर दीपाजी राणेंचा इतिहास सर्वांसमोर येणे आवश्यक असून त्यांच्या त्यागाची प्रत्येकाला जाणीव झाली पाहिजे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
लढा पुढेही सुरूच राहणार : अॅड. देसाई
इतिहास विसरणारी जी माणसे असतात त्यांचा इतिहास पण बिघडलेला असतो आणि भूगोल पण बिघडतो. सत्तरी तालुक्मयाचा इतिहास तेजोमय आहे. व त्यात प्रचंड मोठे सामर्थ आहे, असे सत्तरी इतिहास संवर्धन समितीचे समन्वयक अॅड. शिवाजी देसाई यावेळी म्हणाले, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे जेव्हा आमदार होते. तेव्हा क्रांतिवीर दीपाजी राणेंचे नाव वाळपई सरकारी इपितळाला देण्याचा ठराव सर्व प्रथम गोवा विधानसभेत मांडला होता. नाणूस किल्ला चळवळीसाठी त्यांनी वेळोवेळी मदत केली आहे. 26 जानेवारी हा दिवस वास्तविक गोवा स्वराज्य क्रांतिदिवस म्हणून गोवा सरकारने घोषित करायला पाहिजे सरकारीपातळीवर हा दिवस क्रांतीवीर दीपाजी राणेंच्या नावाने क्रांतीदिन म्हणून साजरा केला पाहिजे. नाणूस किल्ल्यासाठी लढा आम्ही यापुढेदेखील सुरूच ठेवणार, असे अॅड. शिवाजी देसाई यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुऊवातीला अॅड. शिवाजी देसाई यांनी क्रांतिवीर दीपाजी राणे व दादा राणे यांच्यावरील ऐतिहासिक पोवाडा मुख्यमंत्र्यासमोर सादर केला. प्रथम मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पोलीस महासंचालक जसपाल सिंह, आयएएस अधिकारी संजित रॉड्रिग्ज यांनी नाणूस किल्ल्यावर पुष्पचक्र वाहून क्रांतिवीर दीपाजी राणेंना मानवंदना दिली. तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दीपप्रज्वलन केले व दीपाजी राणेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. वाळपई पोलिस प्रशिक्षण केंद्र आणि पोलिसांनी सरकारी नियमानुसार घोषणांसह क्रांतिवीर दीपाजी राणेंना मानवंदना दिली. मुख्यमंत्र्यांनी नाणूस किल्ल्याची पाहणी केली. तसेच नाणूस किल्ल्याच्या शेजारी असलेल्या म्हादई नदीचे दर्शन घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय नाईक यांनी केले. दीपाजी राणे यांनी आभार मानले.
चौदा वर्षांच्या तपाचे फलित
सुरवातीला नाणूस किल्ला अनेकांना माहीत नव्हता. दिवंगत पत्रकार भाई तेंडुलकर 26 जानेवारीला क्रांतीदिन कार्यक्रम सत्तरी तालुक्मयातील पत्रकारांना सोबत घेऊन करायचे. पण हा कार्यक्रम बंद पडला. सत्तरी इतिहास संवर्धन समितीने हे शिवधनुष्य हातात घेतले. सातत्याने मोठ्या प्रमाणात नाणूस किल्ल्यावर प्रत्येक प्रजासत्ताक दिनानिमित्त क्रांतिदिन कार्यक्रम केला. सरकार दरबारी अनेक विनंत्या, अर्ज केले पण काहीही होत नव्हते. परंतु समितीने जिद्द सोडली नाही. अखेर पुरावे शोधून काढलेच आणि मुख्यमंत्र्यांच्या साहाय्याने सत्तरी तालुक्मयाचा संपूर्ण इतिहास गोवा स्वातंत्र्य लढ्याच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमात आणला. त्यामुळेच आजच्या ऐतिहाहिक दिनी चौदा वर्षांच्या तपाचे फलित झाले असे म्हणावे लागेल.