28 तारखेपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ : चर्चा आणि बैठकांचा वाढला जोर : काही ठिकाणी नेत्यांच्या दोन गटातच लढती : तर काही ठिकाणी भावकी-भावकीमध्ये लढती
प्रतिनिधी/सांगली
जिल्ह्य़ातील 452 ग्रामपंचायतींच्या होणाऱया निवडणुकीत आता महाविकास आघाडी विरूध्द भाजपा असा सामना रंगणार आहे. तर काही ग्रामपंचायतीमध्ये नेत्यांच्याच दोन गटात धुमशान होणार आहे. तर काही ठिकाणी भावकी विरोधात भावकी अशी लढत होणार आहे. सध्या या निवडणुकीसाठी चर्चा, बैठका आणि रूसवे-फुगवे काढण्याचे काम सुरू आहे. सोमवार 28 पासून अर्ज भरण्यास प्रारंभ होत आहे. अनेक ठिकाणी आता पॅनेलची तयारीही झाली आहे.
जिल्हय़ात ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱया ग्रामपंचायती, नव्याने स्थापित ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणुकीचा जाहीर कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील 452 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. जिल्हय़ातील जवळपास 70 टक्के ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे या गावपातळीवरील निवडणुकीत आपलेच वर्चस्व ठेवण्यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना मिळून महाआघाडी झाली आहे. महाआघाडीच्यावतीने अनेक ग्रामपंचायतीमध्ये पॅनेल लागत आहेत. भाजपाने आपल्याबरोबर रिपाईसह काही छोट्य़ा पक्षांना घेत या निवडणुका लढविण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे जिल्ह्य़ात महाविकास आघाडी विरूध्द भाजपा असाच सामना रंगणार आहे.
दरम्यान ज्या गावात एकाच पक्षाचे मोठे वर्चस्व आहे. त्याठिकाणी मात्र या नेत्यांच्या दोन गटातच या निवडणुका होत आहेत. त्याला गावपातळीवरील पॅनेल करण्यात आले आहे. तर अनेक छोटय़ा गावात भावकी विरूध्द भावकी अशी निवडणूक होत असून यामध्ये कोणताही पक्ष नसून सर्वपक्षीय एकत्रित लढत आहेत. काही गावात तर सत्ताधारी गटाच्याविरोधात सर्वपक्षीय विरोधक म्हणून निवडणूक होत आहे. त्यासाठी आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाचा धुरळा उडत चालला आहे. गावपातळीवर या निवडणुकांना मोठे महत्व येण्याचे कारण म्हणजे आता केंद्र आणि राज्य सरकारने ज्या योजना राबविल्या आहेत. त्याचा सर्व निधी हा गावपातळीवर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांना मोठे महत्व प्राप्त झाले आहे. तसेच राजकीय नेत्यांनी गाव आपल्याच ताब्यात राहण्यासाठीही आता विशेष लक्ष दिले आहे.
जिल्हय़ात ज्या 452 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. त्यामध्ये आटपाडी तालुक्यातील 26, जत 81, कडेगाव 43, कवठेमहांकाळ 29, खानापूर 45, मिरज 38, पलूस 16, शिराळा 60, तासगाव 26, वाळवा 88 अशा एकूण 452 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
निवडणूक कार्यक्रम असा
नामनिर्देशनपत्रे भरण्यास 28 नोव्हेंबर 2022 ते दि. 2 डिसेंबर 2022 (शुक्रवार) सकाळी 11 ते दुपारी 3 असा वेळ आहे. त्यानंतर नामनिर्देशनपत्र छाननी 5 डिसेंबर सकाळी 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक 7 डिसेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 7 डिसेंबर दुपारी 3 वाजल्यानंतर. मतदानाचा दिनांक 18 डिसेंबर सकाळी 7.30 वाजल्यापासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत.