मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फीत कापून शुभारंभ : स्मार्ट सिटी अंतर्गत 30 कोटी निधीतून विकास
प्रतिनिधी /बेळगाव
मध्यवर्ती बसस्थानकाचा उद्घाटन सोहळा मंगळवारी थाटात पार पडला. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते फीत सोडून या आधुनिक बसस्थानकाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अनिल बेनके होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री बी. श्रीरामलू, नगरविकास मंत्री बी. ए. बसवराज भैरती, पालकमंत्री गोविंद कारजोळ, आमदार दुर्योधन ऐहोळे, डॉ. बसवराज केलगार, खासदार इराण्णा कडाडी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. शिवाय मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
प्रारंभी धनगरी ढोल वादन झाले. यावेळी परिवहनच्या महिला कर्मचाऱ्यांनी कलश घेऊन स्वागत केले. स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या सुसज्ज, आधुनिक मध्यवर्ती बसस्थानकाचा उद्घाटन सोहळा झाला. 2016 ला या बसस्थानकाच्या कामाला प्रारंभ झाला होता. मात्र मध्यंतरी कोरोना आणि कामगारांच्या अभावामुळे काम लांबणीवर पडले होते. मात्र त्यानंतर काम युद्धपातळीवर झाले होते. बसस्थानकातील अंतर्गत फर्निचर, फरशी आणि इतर कामेदेखील मार्गी लावण्यात आली आहेत. शिवाय सुसज्ज आणि अनेक सोयियुक्त बसस्थानक प्रवाशांसाठी खुले करण्यात आले आहे.
यावेळी आमदार अनिल बेनके म्हणाले, स्मार्ट सिटी अंतर्गत बसस्थानकाची उभारणी करण्यात आली आहे. शिवाय बसस्थानकात सुसज्ज असा फलाट उभारण्यात आला आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी शेकडो बस आणि प्रवाशांची सोय होणार आहे. विशेषत: आंतरराज्य बससाठीदेखील स्वतंत्र फलाट उभारण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना सोयिस्कर होणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनीही आपले विचार मांडले.
स्मार्ट सिटी अंतर्गत बसस्थानकाचा विकास
स्मार्ट सिटी अंतर्गत तब्बल 30 कोटींच्या निधीतून या बसस्थानकाचा विकास साधण्यात आला आहे. लांबणीवर पडलेले काम पूर्ण झाल्यानंतर बसस्थानक आता प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. त्याबरोबर सीबीटी बसस्थानकाचाही विकास केला जात आहे. या ठिकाणी हजारो वाहनांसाठी पार्किंगस्थळ उभारले जात आहे. त्याबरोबर दोन्ही बसस्थानकांना जोडण्यासाठी भुयारी मार्गाची उभारणीदेखील करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही बसस्थानकात ये-जा करणे प्रवाशांना सोयिस्कर होणार आहे. बसस्थानकात अत्याधुनिक शौचालय, प्रसाधनगृहे, पाण्याची सोय, आसन व्यवस्था आणि इतर सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आता सुखकर होणार आहे.