सीपीएड् मैदानावर आयोजन : 170 हून अधिक स्टॉल्सची मांडणी : गृहनिर्माण साहित्य एकाच छताखाली उपलब्ध
प्रतिनिधी /बेळगाव
तरुण भारत पुरस्कृत ‘घरकुल 2022’ प्रदर्शनाचे शुक्रवारी थाटात उद्घाटन करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम-बेळगाव आयोजित व कन्सल्टींग सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशनच्या सहकार्याने सीपीएड मैदानावर दि. 25 ते 30 नोक्हेंबर दरम्यान भव्य प्रदर्शन भरविले आहे. गृहनिर्माणासाठीचे सर्व साहित्य एकाच छताखाली, अशी या प्रदर्शनाची मांडणी करण्यात आली आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडिअर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते झाले.
प्रत्येक व्यक्तीला आपले एखादे घरकुल असावे अशी इच्छा असते. त्यासाठी लागणारे साहित्य, फर्निचर, इंटेरिअर, गृह निर्माण प्रकल्प हे सर्व घरकुल प्रदर्शनात मांडण्यात आले आहे. केवळ बेळगावच नाही तर महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातील अनेक नामवंत बॅण्ड या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत.
शुक्रवारी सीपीएड मैदानावर प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. ब्रिगेडिअर जॉयदीप मुखर्जी यांच्या समवेत रोटरीचे प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे, तरुण भारतच्या कार्यकारी संचालक रोमा ठाकुर, गोल्ड प्लस ग्लासचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश त्यागी, अल्ट्राटेक सिमेंटचे विभागीय व्यवस्थापक राघवेंद्र देसाई, जाल कंपनीचे अजय अगरवाल, रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष उमेश रामगुरवाडी, कन्सल्टींग सिव्हिल असोसिएशनचे अध्यक्ष संग्राम पाटील, इव्हेंट चेअरमन आनंद चौगुले व सी. आर. पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा सोहळा पार पडला.
घरकुल प्रदर्शनाची नक्कीच मदत होईल -ब्रिगेडिअर जॉयदीप मुखर्जी
ब्रिगेडिअर जॉयदीप मुखर्जी म्हणाले, मागील 100 वर्षांपासून मराठा लाईट इन्फंट्रीचे रेजिमेंटल सेंटर बेळगावमध्ये आहे. एमएलआयआरसी हा एक बेळगावचा भाग बनला आहे. येथील वातावरण व नागरिकांच्या स्वभावामुळेच मराठा इन्फंट्रीचा तीनपैकी एक जवान निवृत्तीनंतर बेळगावमध्ये येवून राहतो. त्यामुळे त्यांना या ठिकाणी घर बांधताना नक्कीच घरकुल प्रदर्शनाची मदत होईल, असे विचार त्यांनी मांडले.
रोटरीचे प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे यांनी रोटरीच्या सामाजिक कार्यांचा उल्लेख करत घरकुल प्रदर्शनाचा इतिहास उलगडला. तरुण भारत वाचल्याशिवाय आमच्या दिवसाची सुरुवात होत नाही, असे गौरवोद्गार काढत रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम, कन्सल्टींग सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशन यांच्या एकत्रित कार्यामुळे आज मोठे प्रदर्शन झाले असल्याचे ते म्हणाले. हे प्रदर्शन अनेकांच्या घरकुलांचे स्वप्न पूर्ण करत असल्याने प्रदर्शनाला बेळगावसह परिसरातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
तरुण भारतचे सीएमओ उदय खाडीलकर यांनी ‘तरुण भारत’च्या घोडदौडविषयी माहिती देत केवळ बेळगावच नाही तर गोवा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी येथे तरुण भारतने आपली वेगळी छाप उमटविल्याचे सांगितले. अन्यायाविरुद्ध झुंज व लोकशिक्षण हे ब्रीद घेऊन तरुण भारत काम करत असून तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर, कार्यकारी संचालक प्रसाद ठाकुर, सई ठाकुर व रोमा ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण भारतची जोरदार वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
गोल्ड प्लस ग्लासचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश त्यागी म्हणाले, गोल्ड प्लस ही एकमेव भारतीय ग्लास उत्पादक कंपनी आहे. कर्नाटक सरकार तसेच बेळगावच्या नागरिकांनी दिलेल्या सहकार्यामुळे आज कणगला परिसरात 2 हजार 500 कोटींचा प्रकल्प साकारला जात आहे. अल्ट्राटेक सिमेंटचे राघवेंद्र देसाई म्हणाले, घरकुल यापूर्वी तरुण भारतची पुरवणी असली तरी आता मात्र तो एक ब्रॅण्ड झाला आहे. अल्ट्राटेक सिमेंट ही देशातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी असून सिमेंट सोबतच इतर बांधकाम क्षेत्रातील उत्पादने तयार करत असल्याचे त्यांनी सांगितले. जाल कंपनीचे अजय अगरवाल यांनी आपल्या कंपनीच्या उत्पादनाविषयी माहिती दिली.
मुख्य प्रवेशद्वाराचे मान्यवरांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. उमेश रामगुरवाडी यांनी प्रास्ताविक केले. संग्राम पाटील यांनी घरकुल प्रदर्शनाच्या प्रारंभापासून आतापर्यंतचा प्रवास उलगडला. प्रमुख पाहुण्यांनी स्टॉल्सना भेटी देऊन त्यांची वेगवेगळी उत्पादने जाणून घेतली. टाईल्स, हार्डवेअर, प्लायवूड, किचन साहित्य, इमारती साहित्य, फर्निचर, ग्लास, इलेक्ट्रॉनिक्स, सिमेंट, लाईट्स, इलेक्ट्रीकल, फायनान्स, रिअल इस्टेट, सजावटीचे साहित्य, वॉटरप्रुफींग, इंटेरिअर, डोअर मॉडय़ुलर यासह इतर साहित्य तसेच खवय्यांसाठी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स मांडण्यात आले आहेत.
रामगुरवाडी खानापूर येथील वक्रतुंड ढोल-ताशा पथकाने ढोल-ताशाच्या ठेक्मयावर कार्यक्रमाला रंगत आणली.
यावेळी तरुण भारतचे संपादक जयवंत मंत्री, जनसंपर्क अधिकारी गिरीधर शंकर यांसह तरुण भारत, रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम व कन्सल्टींग सिव्हिल इंजिनिअर्स परिवारातील सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन मंजिरी पाटील यांनी केले. सी. आर. पाटील यांनी आभार मानले.
प्रदर्शनामध्ये शुद्ध मध उपलब्ध
येथील सीपीएड मैदानावर भरविलेल्या घरकुल प्रदर्शनामध्ये लोककल्प फौंडेशनतर्फे शुद्ध मधाचा स्टॉल लावला आहे. लोककल्प हा लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेडचा कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सीएसआर) चा कार्यक्रम आहे. संस्थापक अध्यक्ष लोकमान्य सोसायटी आणि तरुण भारत बेळगावचे सल्लागार प्रमुख किरण ठाकुर यांचा खेडय़ातील लोकांच्या जीवनात चिरस्थायी बदल घडवून आणण्याचा हा उपक्रम आहे.
लोककल्प फाउंडेशनने खानापूरच्या घनदाट जंगलात वसलेल्या कणकुंबी आणि जांबोटी भागातील 32 गावे दत्तक घेतली आहेत. लोककल्प फाउंडेशनचे मुख्य उद्दिष्ट या लोकांना उपजीविका प्रदान करणे आणि त्यांचे जीवन सुधारण्यास मदत करणे हे आहे. लोककल्प फाऊंडेशनने लोकांना मधमाशांच्या पेटय़ा उपलब्ध करून दिल्या असून या पेटय़ांमधून मध संकलित केले जाते.
स्टॉल क्रमांक 3 वर मध उपलब्ध
मध शुद्ध आणि 100 टक्के नैसर्गिक आहे. मध सेंद्रिय पद्धतीने शुद्ध करून त्यावर प्रक्रिया केली जाते. प्रक्रिया केलेला मध गावातील महिलांनी सीलबंद करून नंतर विक्रीसाठी उपलब्ध करून दिला आहे. कणकुंबीचा मध हा भारतातील सर्वोत्तम मधात मानला जातो आणि त्यामध्ये औषधी मूल्ये देखील आहेत. हा मध आता ग्राहकांसाठी विक्रीसाठी असून, 26 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत घरकुल प्रदर्शनात स्टॉल क्रमांक 3 वर उपलब्ध आहे.